आंदोलनाला यश! बार्टीच्या विद्यार्थ्यांचा फेलोशिपचा मार्ग मोकळा..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे दोन दिवसांत मिनिट्स ऑफ मिटींग बाहेर येतील, बुधवारीपर्यंत जीआर देखील येईल. जीआर आला की कागदपत्रांची पडताळी होईल. त्यानंतर पंधरा दिवसांत फेलोशीप अकाउंटला जमा होणे अपेक्षित आहे, अशी माहिती उपोषणकर्त्या पल्लवी गायकवाड यांनी दिली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (Barti) पुणे येथील शिक्षण घेणारे 763 विद्यार्थ्यी मागील दोन वर्ष (2022) पासून फिलोशिप (Fellowship) मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडले होते. त्यासाठी हे सर्व विद्यार्थी मागील दोन वर्षापासून वेगवेगळ्या मार्गाने लढा लढत आहेत. आज अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आले असून फेलोशीप मिळण्याचा मार्ग मोकळा (Paving the way for fellowship) आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे दोन दिवसांत मिनिट्स ऑफ मिटींग बाहेर येतील, बुधवारीपर्यंत जीआर देखील निघेल. जीआर आला की कागदपत्रांची पडताळणी होईल. त्यानंतर पंधरा दिवसांत फेलोशीप अकाउंटला जमा होणे अपेक्षित आहे, अशी माहिती उपोषणकर्त्या पल्लवी गायकवाड (Pallavi Gaikwad) यांनी दिली आहे.
मागील दोन-अडीच वर्षापासून आमचा फेलोशिप मिळण्याचा प्रश्न प्रलंबित होता. आम्ही खुप आंदोलने केली. मात्र, आता जे शेवटचे आंदोलन झाले, यामध्ये मी स्वतः १२ दिवस उपोषण केले . हे उपोषण खुप प्रभावी ठरले आहे. कारण आमची मागणी हीच होती की शासनामधील निर्णायक व्यक्तीसोबत आमची बैठक व्हावी. त्यानुसार २३ ऑगस्ट रोजी आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये आमच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. हा लढा सर्वस्वी फक्त विद्यार्थ्यांनी जिंकला आहे. यासाठी मी आणि माझे सहकारी हर्षवर्धन दवणे यांनी १२ दिवस जीव पणाला लावून आंदोलन केले.
आम्ही जेवढे ७६३ विद्यार्थी या आंदोलनात उतरलो होतो, त्या सर्वांनी हा लढा जिंकला आहे. त्यामुळे हा लढा आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या कुबड्याशिवाय जिंकला आहे. याचा मला अभिमान वाटतो. २०२२ मधील ७६३ विद्यार्थ्यांना फिलोशिप मिळत नव्हती. त्यासाठी मागील बारा दिवसात जे काही उपोषण झाले हे आजपर्यंतच्या बार्टीच्या उपोषणातील सर्वात निर्णायक उपोषण ठरले आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो. त्यामुळे शासन अक्षरश: विद्यार्थ्यांपुढे झुकले,असे मत उपोषणकर्त्या पल्लवी गायकवाड यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना व्यक्त केले.
---------------------
बार्टीच्या ७६३ विद्यार्थ्यांना संपूर्ण अधिछात्रवृत्ती
बार्टीच्या ७६३ पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी अधिछात्रवृत्ती योजनेतील २०२२ च्या विद्यार्थ्यांना ५० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने सारथी आणि महाज्योती प्रमाणेच या विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी करून व शपथपत्र घेऊन पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्यात येईल. यासाठी एकूण सुमारे ३७ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली.