प्रश्नपत्रिका इंग्रजीसह मराठीतही, उत्तरेही दोन्ही भाषेत लिहा! चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा
एका प्रश्नाचे उत्तर मराठीत आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तरही इतर भाषेतही लिहिता येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिल्यानंतर आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. प्रामुख्याने तंत्रनिकेतन महाविद्यालयांमधील (Polytechnic) परीक्षांचे पेपर इंग्रजी आणि मराठी भाषांमध्येही असतील. त्याचप्रमाणे उत्तरेही दोन्ही भाषेत लिहिण्याची मुभा असेल. एका प्रश्नाचे उत्तर मराठीत आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तरही इतर भाषेतही लिहिता येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (DES) डीईएस पुणे विद्यापीठाचा (DES Pune University) शुभारंभ पाटील आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष शाहू छत्रपती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डीईएसच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर या वेळी उपस्थित होते.
‘इस्रो’ची नोकरी नको रे बाबा; उच्चशिक्षित तरुणांची पाठ, काय आहे नेमकं कारण?
पाटील म्हणाले, व्यावसायिक अभ्यासक्रम विशेषतः अभियांत्रिकी पदवी व पदविका अभ्यासक्रमांची मराठीतील पुस्तके तयार केली. मातृभाषेशिवाय विद्यार्थ्यांना विषय नीट समजत नाही. त्यामुळे तो घोकंपट्टी करून पास होतो. त्यामुळे आता शिक्षकाने कोणत्याही भाषेत शिकवावे, विद्यार्थ्याला हव्या त्या भाषेत श्रवण करता येईल, असे सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे. एक-दोन महिन्यात हा प्रयोग सुरू होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जग ज्या दिशेने चालले आहे, त्याचा विचार करता शिक्षणात काही गोष्टी यायला हव्यात. कला, वाणिज्य, विज्ञानाचा विचार न करता जगाला, उद्योगाला, समाजाला काय हवे आहे, याचा विचार करून अभ्यासक्रम निर्माण झाले पाहिजेत. विद्यापीठांची विद्यार्थी संख्या कमी असायला हवी. त्यातून त्यांनी कमीत कमी गरजा पूर्ण करून स्वायत्त विद्यापीठे द्यायला हवीत, असा विचार केला. भारतीय तरुण-तरुणींचा बॉडी लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्या मनामध्ये एक भीती असते. कारण आपण खूप गरीब आहोत, हे सुरूवातीपासून त्यांच्या मनात बिंबवले आहे. त्यामुळे आम्ही विद्यापीठांना आग्रह धरत आहोत की, तुम्ही काही नवीन करणार असाल तर विद्यापीठ मागा. संशोधन आणि नाविण्यतेशिवाय आपला देश श्रीमंत होणार नाही.
डॉ. अभय जेरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत विकसित अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिक्षणाच्या अनुषंगाने आपण त्याचा विचार सुरू केला आहे का? काही वर्षांपूर्वी असे म्हटले जायचे बँकिंग हवे आहे, परंतु बँकांची गरज लागेल का? त्या प्रमाणे शिक्षण हवे आहे, शिक्षण संस्थांची गरज लागणार आहे का? याचा विचार करावा लागेल. आज शिक्षण संस्था 18 ते 22 वयोगटातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी विचार करतात. बदलल्या काळात दर दहा वर्षांनी कौशल्ये विकसित करावी लागतील. म्हणजेच विद्यार्थ्यांचा शिक्षण संस्थांशी 50 वर्षांची भागीदारी असेल. त्या प्रकारची शिक्षण संस्कृती तयार करावी लागेल.
ऑनलाईन माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असताना, शिक्षक बेरोजगार होणार का? शिक्षकाला केवळ अध्यापकाच्या भूमिकेत राहता येणार नाही. सध्या विभक्त कुटुंब पद्धती आहे. आई-वडिल दोघेही नोकरी करतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोठ्या भावाच्या भूमिकेतून, समुपदेशकाच्या भूमिकेतून पाठीशी राहावे लागणार आहे. त्याची भूमिका बदलणार आहे, असेही जेरे यांनी सांगितले. उपाध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य यांनी प्रास्ताविक भाषण केले, स्वाती सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.