आरटीई प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यात राबवणार का ? 

बहुतांश वेळा शाळा सुरू होऊन दोन ते अडीच महिने उलटून  गेल्यानंतर आरटीईच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळतो.परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.

आरटीई प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यात राबवणार का ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रात बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील प्रवेश प्रक्रिया (Admission process in English medium schools)डिसेंबर महिन्यातच सुरू होते.ही बाब  विचारात घेऊन राज्य शासनाने सुध्दा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (Right to Education Act- RTE) 25 टक्के आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणारी RTE प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यांपासूनच (RTE Admission Process From December Months)राबवायला हवी,अशी मागणी पालक संघटनांकडून केली जात आहे.मात्र,नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शिक्षण मंत्रीपद (Minister of Education)कोणाकडे जाते.तसेच नवीन मंत्री याबाबत काय सूचना देतात यावर बरेच काही अवलंबून आहे,असे बोलले जात आहे. 

आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटकातील पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा,यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया शाळा सुरू झाल्यानंतर सुरू होते.बहुतांश वेळा शाळा सुरू होऊन दोन ते अडीच महिने उलटून  गेल्यानंतर आरटीईच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळतो.परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू होतात.त्याच दिवशी आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,याबाबत काळजी घ्यावी,अशी मागणी पालक संघटनांकडून केली जात आहे. 

देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून विद्यार्थ्यांना एक सामान अभ्यासक्रम देण्याबाबत चर्चा सुरू आहे.मात्र,महाराष्ट्रात सीबीएसई बोर्ड आणि एसएससी बोर्डासह इतरही काही बोर्डाच्या शाळा सुरू आहेत.मात्र,या शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याचा कालावधी वेगवेगळा आहे.राज्याच्या शिक्षण विभागाकडून सुध्दा एसएससी बोर्डाच्या शाळांचा विचार करूनच आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते.परंतु, यंदा विधानसभा निवडणूकीनंतर कोणाची सत्ता स्थापना होते आणि कोणाकडे शिक्षणमंत्रीपद येते.त्यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतील,असे बोलले जात आहे.परंतु, दारवर्षासारखी यंदाही आरटीई प्रवेश प्रक्रिया उशीरा सुरू होऊ नये,अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

-----------------------------------------

NEP चा विचार करता आता सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष एकाच वेळी सुरू हव्ययला हवे.आरटीई प्रवेश उशीरा होत असल्याने विद्यार्थी व पालकांना तडजोड करावी लागते.सर्व सरकारी शाळा सुरू होतात त्याचवेळी त्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्याचे शासनाचे धोरण आहे.त्याचदृष्टीने शासनाने आरटीई प्रवेशाचे नियोजन करावे.विद्यार्थ्यांचे व पालकांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी शासनाने घ्यावी.त्यासाठी डिसेंबर महिन्यातच आरटीई प्रवेश प्रक्रिया राबावण्याचे नियोजन करावे. 
- दिलीपसिंग विश्वकर्मा, महा पॅरेंट्स, पुणे
------------------------------------------

सीबीएसई व एसएससी बोर्डाच्या शाळा एकाच वेळी सुरू करण्याबाबत शासनाने विचार करायला हवा.त्यामुळे विद्यार्थ्यांचा सुध्दा फायदा होईल.तसेच आरटीई प्रवेश प्रक्रिया उशीरा सुरू झाल्याने त्यात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालता येईल.

-मुकुंद किर्दत, आप पालक युनियन, पुणे