MPSC कर सहायक, लिपिक पदाच्या परीक्षांचे निकाल कधी लावणार ? विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना
पूर्व परीक्षा होऊन जवळजवळ १ वर्ष आणि मुख्य परीक्षा होऊन ४ महिने होत आले तरीही अद्याप या परीक्षेचा निकाल जाहीर झाला नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य सरकारने मेगा भरतीची (Mega Bharti)घोषणा केली केल्यानंतर विविध रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिध्द झाल्या. तसेच परीक्षाही घेण्यात आल्या.परंतु, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) परीक्षांचे निकाल लवकर जाहीर केले जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कर सहाय्यक आणि लिपिक पदाची मुख्य परीक्षा (Tax Assistant and Clerk Posts) होऊन बराच कालावधी लोटला. त्याचप्रमाणे अद्याप आयोगाने कौशल्य चाचणीची तारीखही घोषित केली नाही.यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सध्या नैराश्याचे वातावरण आहे.त्यामुळे आयोगाने प्रलंबित परीक्षेचा निकाल (Pending Exam Result)जाहीर करून कौशल्य चाचणीची तारीख घोषित करवी,अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यात कर सहायक ४६८ पदांसाठी आणि लिपिक पदाच्या ७ हजार ३४ अशा एकूण ७ हजार ५०२) पदांसाठी परीक्षा घेण्यात आली . या भरतीची जाहिरात २० जानेवारी २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. पूर्व परीक्षा ३० एप्रिल २०२३ रोजी व मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०२३ रोजी घेतली गेली. पूर्व परीक्षा होऊन जवळजवळ १ वर्ष आणि मुख्य परीक्षा होऊन ४ महिने होत आले तरीही अद्याप या परीक्षेचा निकाल जाहीर झाला नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
लोकसभा निवडणुकांमुळे आयोगाने विविध परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.या परीक्षा केव्हा होणार याबाबत कोणतेही संकेत नाहीत.आयोगाने वापरलेला यथावकाश शब्द विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दड बसवणारा आहे.त्यामुळे आयोगाने प्रलंबित निकाल लवकर जाहीर करून पुढे ढकललेल्या परीक्षांच्या तारखा लवकर जाहीर कराव्यात,अशी मागणी केली जात आहे.
निकाल आल्यानंतर कौशल्य चाचणी होणार असून तिचीही तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.ही प्रक्रिया लांबत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.लवकर निकाल आला नाही तर प्रक्रिया पूर्ण होण्यास दीड ते दोन वर्ष लागतील, अशी भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
---------------------------------------
एमपीएससीकडून घेतण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होता नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आले आहे.निकाल लांबणे, परीक्षा पुढे ढकलणे,पदभरतीच्या जाहिराती वेळेत प्रसिध्द न करणे आदी कारणांमुळे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिक, आर्थिक आणि सामाजिक कुचंबना होते.त्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून आयोगाने कर सहाय्यक आणि लिपिक पदाच्या परीक्षांचा निकाल लवकर जाहीर करावा.
- महेश बढे - एमपीएससी स्टुडेंट राईट्स