शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदवण्याचा आज शेवटचा दिवस ?
शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 1 लाख 41 हजार 477 अभियोग्यता धारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले आहेत तर 1 लाख 35 हजार 855 अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबवल्या जात असलेल्या शिक्षक भरतीसाठी(teacher recruitment)पात्रताधारकांना प्राधान्यक्रम नोंदविण्याची संधी 12 फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली होती. परंतु, ही मुदत 13 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 1 लाख 35 हजार 855 उमेदवारांनी प्राधान्यक्रम ब्लॉक केले आहेत.
शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे. 5 फेब्रुवारीपासून अभियोग्यताधारकांना प्राधान्यक्रम नोंदवण्याची संधी देण्यात आली. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 1 लाख 41 हजार 477 अभियोग्यता धारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले आहेत तर 1 लाख 35 हजार 855 अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. प्राधान्यक्रम जनरेट केलेले अभियोग्यताधारक आणि प्राधान्यक्रम लॉक केलेले अभियोग्यताधारक यांच्या आकडेवारीचा विचार केला तर केवळ साडेपाच हजार उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करायचे राहून गेले आहेत.
दरम्यान, उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे शिक्षक भरती बाबत याचिका दाखल करण्यात आली आहे.रिट याचिका क्रमांक 1606/2024 मधील याचिका करण्याची मागणी विचारात घेता त्या संदर्भात न्यायालयाचे स्पष्ट निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील टप्प्यावरील कार्यवाही करता येत नसल्याने प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा 13 फेब्रुवारी पर्यंत पुढे सुरू ठेवण्यात येत आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे शिक्षण विभागातर्फे परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.