मोठा निर्णय : शाळांमध्ये लवकरच मोठी कंत्राटी शिक्षक भरती होणार..
आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचा १६ नोव्हेंबर २०२२च्या निर्णयाद्वारे सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे. या सुधारित आकृतिबंधानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांतील शिक्षकांच्या मंजूर १ हजार ७९१ पदांच्या सेवा बाह्यस्रोतांद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी जीईएम संकेतस्थळावर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षक होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याच्या आदिवासी विभागाने आश्रम शाळांमध्ये (Tribal Department Ashram School) शिक्षकांच्या १ हजार ७९१ मंजूर (1 Thousand 791 teacher posts approved) पदांची सेवा बाह्यस्रोतांद्वारे (कंत्राटी) (Outsourcing (contractual) recruitment) उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी ८४ कोटी ७४ लाख ५५ हजार रुपये इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्यामुळे राज्यातील आदिवासी विभागाच्या शाळांमध्ये लवकरच मोठी कंत्राटी भरती राबवण्यात येणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचा १६ नोव्हेंबर २०२२च्या निर्णयाद्वारे सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे. या सुधारित आकृतिबंधानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांतील शिक्षकांच्या मंजूर १ हजार ७९१ पदांच्या सेवा बाह्यस्रोतांद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी जीईएम संकेतस्थळावर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. बाह्यस्रोतांद्वारे उपलब्ध केल्या जाणाऱ्या शिक्षकांमध्ये २२९ उच्च माध्यमिक शिक्षक, ४५५ माध्यमिक शिक्षक, १२० पदवीधर प्राथमिक शिक्षक, १७८ प्राथमिक शिक्षक इंग्रजी, ८०९ प्राथमिक शिक्षक मराठी यांचा समावेश असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
आदिवासी विकास विभागाने निवासी आश्रमशाळा समूह योजना कार्यान्वित केलेली आहे. अतिदुर्गम, डोंगराळ व पाड्यातील आदिवासी मुला-मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना सुशिक्षित करणे आणि त्यायोगे त्यांचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा उद्देश आहे. शिक्षणाची गंगा दऱ्याखोऱ्यांत, दुर्गम पाड्यांत पोहोचविण्याचे काम शासकीय आश्रम शाळांमार्फत होत आहे. आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारित ४९७ शासकीय आश्रम शाळा, ५५६ अनुदानित आश्रम शाळा आहेत. मात्र, येथे शिक्षकांचा तुटवडा जाणवत असल्याने, सरकारने येथे कंत्राटी पद्धतीने शिक्षक उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
________________________________________________________
शिक्षण क्षेत्रास नेहमी विसंगत आदेशाचा अनुभव येत आहे जर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होत असेल तर, आता या थेट भरतीचा अर्थ काय?. पात्रता आणि शिक्षण घेऊन शिक्षक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांनी यामधून काय अर्थ घ्यायचा. 2022 पासूनचा प्रस्ताव आत्ता मंजूर केला जातोय म्हणजे इतकी प्रचंड पदे अद्याप भरलेली नाहीत हे आश्चर्यच आहे.
- महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष , मुख्याध्यापक संघ