विद्यापीठांचे काम वाढले;आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे 'अपार आयडी' काढावे लागणार
राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे अद्याप अपार आयडी काढण्यासंदर्भात कुठलेही पत्रक प्राप्त झाले नसल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी जानेवारी महिनाअखेरीस मुंबई येथे झालेल्या विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंच्या बैठकीत उच्च शिक्षण विभागाने या संदर्भातील सूचना दिल्या असल्याचे सांगितले जात आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्र शासनाचा 'अपार आयडी' (Apaar ID) हा महत्त्वकांक्षी उपक्रम असून शालेय विद्यार्थ्यांबरोबर आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अपार आयडी (Automated Permanent Academic Account Registry (APAAR) ID काढण्याच्या सूचना सर्व विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत राज्यातील सर्व विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याचे काम करावे लागणार आहे. परिणामी सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांचे (Universities and Colleges)काम चांगलेच वाढणार आहे. मात्र, हे अपार आयडी कसे काढावेत आणि त्यासाठी विद्यार्थी व पालकांची संमती घ्यावी किंवा नाही, याबाबत शासनाकडून अद्याप कुठलेही स्पष्टीकरण प्राप्त झालेले नाही. त्यामुळे पुढील काळात याबाबत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांचा 'वन नेशन वन स्टुडन्ट आयडी' असणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने केंद्र शासनाने सर्व राज्यांना शालेय विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याबाबत 2023 मध्येच सूचना दिल्या आहेत. पुढील काळात प्रत्येक विद्यार्थ्याकडे जागतिक नागरिक म्हणून पाहिले जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा एक स्वतंत्र युनिक आयडी असावा, असे समोर आले. या युनिक आयडी मध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल, समग्र अहवाल कार्ड, ओलंपियाड, विद्यार्थ्यांनी इतर उपक्रमात केलेली कामगिरी, क्रीडा, कौशल्य प्रशिक्षण अधिक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश इत्यादीची माहिती शालेय विद्यार्थ्यांच्या अपार आयडी मध्ये दिली जाणार आहे.
अपार आयडीला विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक जोडला जाणार आहे. मात्र, त्यासाठी पालकांची संमती घेणे गरजेचे आहे.केंद्रीय शिक्षण विभागाने शालेय शिक्षण विभागाला पाठविलेल्या परिपत्रकात असे स्पष्ट केले आहे. परंतु,राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे अद्याप अपार आयडी काढण्यासंदर्भात कुठलेही पत्रक प्राप्त झाले नसल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी जानेवारी महिनाअखेरीस मुंबई येथे झालेल्या विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंच्या बैठकीत उच्च शिक्षण विभागाने या संदर्भातील सूचना दिल्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे अपार आयडी काढण्याच्या मागे लागले आहेत.
राज्यातील काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या 28 फेब्रुवारी पर्यंत विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याचे काम पूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात विद्यापीठ व महाविद्यालयांना अपार आयडी काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मागे पाठपुरावा करावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र अद्याप अनेक विद्यापीठांनी संलग्न महाविद्यालयांना अपार आयडी काढण्यासंदर्भात कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत.त्यामुळे इतक्या कमी कालावधीत हे काम कसे पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.