पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना काढले शाळेबाहेर ; राजगुरूनगर येथील प्रकार
गेल्या वर्षाचे शुल्क भरले नाही म्हणून शेठ केशरचंद पारख या शाळेतील विद्यार्थ्यांनी बाहेर काढण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यभरातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जात असताना राजगुरुनगर (raajgurunagar) येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या (Khed Taluka Education Society) शेठ केशरचंद पारख या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील (Sheth Kesharchand Parakh English Medium School) विद्यार्थ्यांना शुल्क भरले नाही (Fees not paid to students) म्हणून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेबाहेर बसवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले नाही तर त्यांच्याकडून काही ॲक्टिव्हिटी करून घेतल्या व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा वर्गात बसविण्यात आल्याचा दावा शाळा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ( Zilla Parishad Chief Executive Officer Ayush Prasad) यांनी दिले आहेत.
हेही वाचा :शिक्षण वारे गुरूजींनी करून दाखवलं; उजाड माळरानावर उभारली आंतरराष्ट्रीय शाळा
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क भरले नाही म्हणून शाळेबाहेर काढले जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. परंतु, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बाहेर बसवण्यात आल्याची ही पहिलीच घटना असावी. गेल्या वर्षाचे शुल्क भरले नाही म्हणून शेठ केशरचंद पारख या शाळेतील विद्यार्थ्यांनी बाहेर काढण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांकडून शुल्क मिळत नाही आणि शासनाकडून आरटीई शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम आणि शासनाकडून दिली जात नाही, त्यामुळे शाळा चालवणे अवघड होत असल्याचे शाळेकडून सांगितले जात आहे.
विद्यार्थ्यांना शुल्कासाठी शाळेबाहेर काढल्याचे समजल्यानंतर स्थानिक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शाळा व्यवस्थापन समितीला धारेवर धरले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यात आले. परंतु, शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना बाहेर काढणे, हे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली केली जात आहे. तसेच पालकांना शुल्क भरण्यासाठी अवधी दिला जाणार आहे.
वेगळी बातमी : पहिल्याच दिवशी अनधिकृत शाळांचे फुटणार बिंग; शिक्षण विभागाच्या शाळांना भेटी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, शिक्षण हक्क कायद्यानुसार शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना अपमानित करून शाळेबाहेर किंवा वर्गाबाहेर काढता येत नाही. त्यामुळे ही घटना समजल्यानंतर तात्काळ येथे शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी मागील वर्षाचेच शुल्क जमा केले नाही. विद्यार्थ्यांनी शुल्क जमा केले नाही तर शाळेतील शिक्षकांचे वेतन करता येणार नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी पालकांशी वेळोवेळी चर्चा करणे अपेक्षित आहे . मुलांना बाहेर काढून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. पुन्हा अशी घटना घडू नये, याबाबत शिक्षणाधिकारी खबरदारी घेणार आहेत.
-------------------
" गेल्या ३५ वर्षाहून अधिक कालावधीपासून आमची शाळा मुलांना दर्जेदार शिक्षण देत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी सुमारे दीड महिना आधीच ५ जून पूर्वी विद्यार्थ्यांनी शुल्क भरावे, अशा सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा शुल्क भरण्याविषयीची माहिती देण्यासाठी आणि काही ॲक्टिव्हिटी करून घेण्यासाठी थोडा वेळासाठी विद्यार्थ्यांना बाहेर बसविण्यात आले होते. मागील वर्षी सुमारे साडेचार लाख रुपये शुल्क बुडवून अनेक विद्यार्थी शाळा सोडून गेले आहेत. तसेच गेल्या तीन वर्षांपासून शाळेला आरटीई अंतर्गत मिळणारी शुल्क प्रतीपूर्तीची ९० लाख ९६ हजार रक्कम प्राप्त झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांचे वेतन करणे अवघड जात आहे."
- ज्योती ठाकूर, मुख्याध्यापिका , शेठ केशरचंद पारख इंग्लिश मीडियम स्कूल