शिक्षणातून मनुष्य घडवणं हेच शिक्षणाचे सर्वोच्च ध्येय - विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर
यावर्षी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ वसंत चिटणीस, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, पुरातत्व व मूर्तिस्थापत्य संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. तारा भवाळकर, योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक, सामाजिक कार्यकर्त्या हेमलता बीडकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शिवाजीराव कदम, नामवंत शल्यविशारद डॉ. संजय कुलकर्णी, ज्येष्ठ प्राध्यापक व सहकारतज्ज्ञ डॉ. मुकुंद तापकिर आणि सुप्रसिद्ध उद्योजक आर. एन. शिंदे या सर्व व्यक्तींना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षणातून मनुष्य घडवणं हेच शिक्षणाचे सर्वोच्च ध्येय असले पाहिजे असे मत विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर (Vidyavachaspati Shankar Abhyankar) यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त (76th Anniversary of Savitribai Phule Pune University) आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' म्हणून नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दि. १० फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे ऑनलाइन उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.डॉ पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ.ज्योती भाकरे, सीएमए चारुशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू गोसावी आणि प्रमुख पाहुणे अभ्यंकर यांच्या हस्ते जीवनसाधना गौरव, युवा गौरव पुरस्कारार्थी सोबत उत्कृष्ट संस्था, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट शिक्षकेतर सेवक आदी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विद्यार्थ्याच्या मनामध्ये अंतप्रेरणा जागवणारे, संशोधनाच्या नव्या वाटांकडे त्यांना नेणारे असे लोकशिक्षक संत या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये अनंत झाले. त्यांची भूमिका एकच होती की, जितुके काही आपणास ठावे, ते ते दुसऱ्यास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळजन सर्वजण हिताय सर्वजण सुखाय अशी संतांची भूमिका होती. हा सर्वांच्या हिताचा वसा शिक्षणातून देता आला पाहीजे असेही अभ्यंकर यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात समग्र कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ वसंत चिटणीस, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, पुरातत्व व मूर्तिस्थापत्य संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. तारा भवाळकर, योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक, सामाजिक कार्यकर्त्या हेमलता बीडकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शिवाजीराव कदम, नामवंत शल्यविशारद डॉ. संजय कुलकर्णी, ज्येष्ठ प्राध्यापक व सहकारतज्ज्ञ डॉ. मुकुंद तापकिर आणि सुप्रसिद्ध उद्योजक आर. एन. शिंदे या सर्व व्यक्तींना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची जीवनसाधना गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.
कुलगुरु गोसावी यांनी विद्यापीठाचा सर्वसमावेशक आलेख यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांसमोर मांडला. या समारंभाचे सूत्रसंचालन विद्यावाणीचे संचालक श्रीदत्त गायकवाड व श्रीयोगी मुंगी यांनी केले तर कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे यांनी यावेळी आभार मानले. यावेळी विद्यापीठाचे अधिष्ठाता, प्रशालेचे संचालक, शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध महाविद्यालयांचे शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.