धक्कादायक! स्वतःच्या मुलाला कॉपी पुरवताना 'तहसीलदार'च पकडला रंगेहाथ
शासनामार्फत ज्या यंत्रणेकडून नियमांची अंमलबजावणी केली जाते, ज्यांच्या विश्वासावर काॅपी मुक्तीचा नारा दिला जातो, आज तिच यंत्रणा काॅपी पुरवत असेल तर, कुंपणच शेत खातंय अशी म्हणायची वेळ आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा (12th exam) सुरू आहे. याच दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. आपल्या स्वत:च्या मुलाला कॉपी पुरवताना नायब तहसीलदाराला (Deputy Tehsildar) रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अनिल तोडमल (Anil Todmal) असे या पुत्र प्रेमात हरवलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. शासनामार्फत ज्या यंत्रणेकडून नियमांची अंमलबजावणी (Enforcement of rules) केली जाते, ज्यांच्या विश्वासावर काॅपी मुक्तीचा नारा दिला जातो, आज तिच यंत्रणा काॅपी पुरवत असेल तर, कुंपणच शेत खातंय अशी म्हणायची वेळ आली आहे.
यंदा बोर्डाच्या परीक्षा कॉपी मुक्त वातावरणामध्ये व्हाव्यात यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. कॉपी मुक्त अभिनयासाठी कठोर नियमावली राबवली जात आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी तहसीलदारानेच नियम धाब्यावर बसवले. पाथर्डी तालुक्यात कॉपी प्रकार सर्वाधिक घडतात हा मागील इतिहास आहे. यातच या तालुक्यात सुरू असलेल्या एका परीक्षा केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर नायब तहसीलदार यांनी मुलाला कॉपी देण्याचा प्रयत्न केला. परंतु, याचवेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. खुद्द तहसीलदारच स्वत:च्या मुलाला कॉपी पुरवत असल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे.
कॉपी मुक्त परीक्षेसाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना जारी केल्या आहेत. सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश दिले आहेत. पण, आता आपल्या पाल्याला कॉपी पुरवतांना पकडल्या गेलेल्या नायब तहसीलदारावर काय कारवाई होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
______________________________
तहसीलदार हे पद दंडाधिकारी पद मानले जाते. ज्यांना न्याय निवडा करायचा असतो. परंतू आज तेच जर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहात असतील मग सामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा ठेवायची कोणाकडून. एका बाजूला आपण काॅपी मुक्तीच्या घोषणा करताना ज्या यंत्रनेने या गोष्टींवर अंकुश ठेवायचा ती यंत्रणाच असे मोकाट वागत असेल तर या व्यवस्थेला काय भवितव्य आहे असा प्रश्न निर्माण होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की, तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाचे गांभिर्य ठेवणे आवश्यक होते. पाथर्डी सारखा तालुका हा मागास आहे. ज्या ठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. या ठिकाणी जितक्या काॅपी मुक्त परीक्षा होतील त्यामधून विद्यार्थी अभ्यास करायला लागतील चांगले शिक्षण घेतील, तेव्हाच ते त्या दारिद्र्यातून बाहेर पडू शकतील.
हेमंत कुलकर्णी, जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ
--------------------------