केंद्र संचालक, पर्यवेक्षक अदलाबदल निर्णय रद्द करा; शिक्षक आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
केंद्रातील केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बदलण्याबाबत आदेश दिले आहेत. परंतु असे केल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त (Copy-free for 10th-12th exams) अभियानांतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित केलेला आहे, त्यामध्ये सर्व शिक्षक आनंदाने सहभागी होत आहे. याच पत्रामध्ये परीक्षा केंद्रातील केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (Center Head, Supervisor and Non-teaching Staff) बदलण्याबाबत आदेश दिले आहेत. परंतु असे केल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे (MLA Dnyaneshwar Mhatre) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले आहे.
सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व एकूणच परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेवर अविश्वास दाखवण्यात आलेला आहे, त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. हा निर्णय घेत असताना शिक्षक आमदारांना विश्वासात घेतलेले नाही, त्यामुळे येणाऱ्या अडचणींचा यामध्ये विचार झालेला दिसून येत नाही. परीक्षेच्या दिवशी पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग अर्धवेळ भरवले जातात, केंद्र संचालक, पर्यवेक्षक दुसऱ्या केंद्रावर पाठवल्याने मूळ शाळा भरवणे अवघड होईल. महिलांना मूळ शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये जाण्यासाठी वाहतुकीच्या अडचणी निर्माण होतील. केंद्र संचालक त्याच शाळेतील असतील तर, त्या शाळेतील भौतिक सुविधा, पिण्याचे पाण्याची सुविधा, वॉशरूम या सर्व गोष्टींची माहिती त्यांना असते, त्यामुळे नियंत्रण करणे सोयीचे जाते. बाहेरच्या केंद्र संचालकांना याबाबतीत अडचणी निर्माण होऊ शकतात.
शिक्षण मंडळ शाळांच्या छोट्या चुकीलाही मोठे दंड आकारते, याप्रसंगी मूळ शाळेतून परीक्षा केंद्राच्या शाळेत जाण्यासाठी शिक्षकांना मंडळ टी.ए, डी.ए देणार आहे का? एखादा विद्यार्थी परीक्षेला येताना घाईगडबडीत हॉलटिकिट विसरून येतो, काही वेळेला हॉलटिकिट हरवते, त्यावेळी तो गडबडून जातो. अशा प्रसंगी परीक्षा केंद्रावर ओळखीचे कोणी भेटले, तर त्याला याप्रसंगी मदत होते. सगळेच अनोळखी असतील तर विद्यार्थी गोंधळून जाईल. शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांना समुपदेशन व्हावे म्हणून प्रयत्न करते, असे एका बाजूला असताना येथे विद्यार्थ्यांसमोर सर्वच यंत्रणा नवीन आणल्याने विद्यार्थी गोंधळून जाणार आहेत.
शहरी भागात सर मिसळ पद्धतीने विद्यार्थ्यांचे केंद्र बदललेले आहे, त्यामुळे एका शाळेतील विद्यार्थ्यांचे पाच ते सात केंद्रावर नंबर येतात. शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक परीक्षा केंद्रावरील खोल्यांमध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. एवढे सर्व असतानाही कॉपी होईल म्हणून सगळी यंत्रणा बदलणे योग्य होणार नाही. परीक्षा कॉपीमुक्त झाल्या पाहिजेत, पारदर्शीपणे घेतल्या पाहिजेत याला आमचाही पाठिंबा व सहकार्य आहे, अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, संचालक, संघटनांनी माझ्याशी संपर्क करून असे मत व्यक्त केले आहे. परंतु वरील सर्व गोष्टीचा विचार करता आपण केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित इतर यंत्रणा बदलणे बाबतचा निर्णय रद्द करावा, अशा मागणी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे.