परीक्षा परिषदेने २,२०७ उमेदवारांचे TAIT परीक्षेचे निकाल केले रद्द
परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत सादर करणे अनिवार्य होते. या मुदतीत कागदपत्र सादर न केल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आलेल्या २ हजार ५३७ विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत व त्यानंतरही एसएमएसद्वारे कळवून २५ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा- २०२५’ (TAIT)उत्तीर्ण झालेल्या परंतु व्यावसायिक अर्हता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध कागदपत्रे मुदतीत सादर न केल्यामुळे २ हजार २०७ विद्यार्थ्यांचे निकाल रद्द (Student results cancelled)करण्यात आले आहेत, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक (Anuradha Oak, Commissioner of Maharashtra State Examination Council)यांनी कळविले आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचे अर्ज भरताना बी.एड. परीक्षेचे व डी.एल.एड. परीक्षेसाठी बसल्याचे (अॅपीअर्ड) अर्जात नमूद केले होते. अशा विद्यार्थ्यांना या व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत सादर करणे अनिवार्य होते. या मुदतीत कागदपत्र सादर न केल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आलेल्या २ हजार ५३७ विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत व त्यानंतरही एसएमएसद्वारे कळवून २५ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. यापैकी २ हजार २०७ विद्यार्थ्यांनी मुदतीत कागदपत्रे सादर केली नाहीत.त्यामुळे या उमेदवारांचे निकाल रद्द करण्यात आले आहेत.
निकाल रद्द करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून याबाबतीत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार सद्यस्थितीत केला जाणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.