विद्यार्थ्यांनी विकसित भारताच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलावा
पुण्यातील खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय येथे 'विकसित भारत ॲम्बेसेडर - युवा कनेक्ट' उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात रक्षा खडसे बोलत होत्या.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी विकसित भारताच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलावा, असे आवाहन केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे (Union Minister of State for Youth Affairs and Sports Raksha Khadse)यांनी शुक्रवारी केले. तसेच 2047 साली देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होत असताना आपला भारत देश कसा असेल, याचाच विचार आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात कायम सुरू असायला हवा. देशाच्या निर्मितीमध्ये तरुणांची भूमिका मोठी आहे. भारताला विकसित देश ही ओळख मिळवून देण्यामध्ये तरुणांचा हातभार लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
पुण्यातील खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय येथे 'विकसित भारत ॲम्बेसेडर - युवा कनेक्ट' उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात रक्षा खडसे बोलत होत्या. याप्रसंगी माजी सैनिक आणि पॅरॉलिम्पिक सुवर्णपदकविजेते मुरलीधर पेटकर, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सल्लागार राजेश पांडे ,प्राचार्य संजय चाकाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
'विकसित भारत ॲम्बेसेडर - युवा कनेक्ट' उपक्रम महाराष्ट्र चॅप्टरची सुरुवात काल केंद्रीय कामगार, रोजगार तथा युवा व्यवहार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते पुण्यातून करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासंदर्भात तरुणांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याचाच एक भाग म्हणून खडकीतील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातही 'विकसित भारत ॲम्बेसेडर - युवा कनेक्ट' उपक्रमाअंतर्गत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 27 नक्षत्रांसाठी प्रत्येक एक म्हणून एकूण 27 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृष्णकुमार गोयल यांनी खडकी शिक्षण संस्थेच्या कार्याचा परिचय दिला. त्यानंतर विकसित भारत अम्बेसेडर कृतिका भंडारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘माय भारत’ पोर्टलविषयी माहिती दिली. या पोर्टलवर नोंदणी केल्यास तरुणांना नोकरीसंदर्भातील सहाय्य, सामाजिक कार्य, तसेच विविध संस्थांमध्ये स्वयंसेवक, आंतर्वासित म्हणून सेवा करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
पुढील टप्प्यात केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पॉवरपॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारताला विकसित देश बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेतला.
त्या पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 10 वर्षांतील कार्यकाळात भारत देशाच्या प्रगतीच्या टप्प्यावर आणले आहे. 2014 पासून सरकारी कार्यपद्धती नरेंद्र मोदी यांनी बदलली आहे. सरकारी कामाला वेग दिला असून पायाभूत सुविधांची अनेक कामे गेल्या 10 वर्षांमध्ये पूर्ण झाली. आता पुढील काळात भारताला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य पंतप्रधान मोदींनी आपल्या सर्वांसमोर ठेवले असून हे लक्ष्य गाठण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान त्यासाठी आवश्यक आहे. हे कार्य पूर्ण करण्यासाठी तरुण वर्गाच्या सूचनांचे स्वागत आहे, असे त्यांनी म्हटले.