विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली; राहुल गांधींचे थेट पंतप्रधानांना पत्र
त्यांनी भेट दिलेल्या वसतिगृहातील दलित, अनुसूचित जमाती (ST), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC), इतर मागास वर्ग (OBC) आणि अल्पसंख्याक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या राहणीमान आणि शैक्षणिक परिस्थितीबद्दल गांधी यांना त्रासदायक अनुभव सांगितले होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यार्थी वसतिगृहांच्या बिघडत्या परिस्थितीबद्दल आणि उपेक्षित समुदायातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (Post-Matric Scholarship) वाटपात होणाऱ्या विलंबाबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
बिहारमधील दरभंगा येथील वसतिगृहाला (Bihar Hostel Conditions) राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच 10 जून रोजी हे पत्र पाठवले आहे. त्यांनी भेट दिलेल्या वसतिगृहातील दलित, अनुसूचित जमाती (ST), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC), इतर मागास वर्ग (OBC) आणि अल्पसंख्याक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या राहणीमान आणि शैक्षणिक परिस्थितीबद्दल गांधी यांना त्रासदायक अनुभव सांगितले होते.
किमान दोन गंभीर प्रश्न सोडवा
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “मी आपणांस विनंती करतो की, दुर्लक्षित समुदायातील 90% विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधींमध्ये अडथळा आणणारे दोन गंभीर प्रश्न सोडवण्यात यावेत.” त्यांनी बिहारमधील आंबेडकर वसतिगृहाच्या स्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे की, येथे सहा ते सात विद्यार्थी एकाच खोलीत राहतात, शौचालये अस्वच्छ आहेत, पिण्याचे पाणी असुरक्षित आहे आणि तेथे ग्रंथालय किंवा इंटरनेट सुविधा नाही.
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तींच्या स्थितीवरही टीका केली आहे. बिहारचे उदाहरण देत त्यांनी नमूद केले की, राज्याचे शिष्यवृत्ती पोर्टल तीन वर्षांपासून कार्यरत नव्हते, परिणामी 2021-22 मध्ये कोणत्याही शिष्यवृत्तीचे वितरण झाले नाही. त्यानंतरही, मदत मिळवणाऱ्या दलित विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली, आर्थिक वर्ष 23 मध्ये 1.36 लाखांवरून आर्थिक वर्ष 24 मध्ये 0.69 लाख झाली. त्यांनी पुढे असा दावा केला की, शिष्यवृत्तीची रक्कम अपमानजनकपणे कमी आहे, ज्यामुळे आधीच दर्जेदार शिक्षण आणि राहणीमानाच्या सुविधांपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांवर भार वाढत आहे.
याबरोबरच राहुल गांधींनी सरकारला परिस्थिती हाताळण्यासाठी दोन प्रमुख कृती करण्याचे आवाहन केले आहे. त्यामध्ये योग्य पायाभूत सुविधा, स्वच्छता, अन्न आणि ग्रंथालये व इंटरनेट सारख्या शैक्षणिक सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी उपेक्षित समुदायातील विद्यार्थ्यांसाठी सर्व निवासी वसतिगृहांचे ऑडिट करा आणि राज्य सरकारांसोबत भागीदारीत शिष्यवृत्ती वेळेवर वितरित करा, आर्थिक मदत वाढवा आणि अंमलबजावणी सुधारा.
दरम्यान, बिहारमधील विद्यार्थी आणि संबंध देशभरातीलच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींचा मुद्दा राहुल गांधी यांनी या पत्राद्वारे अधोरेखीत केला आहे.

