MPSC : दोन वर्षांपासून उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत; सुवर्णा खरात यांना पत्र

उमेदवारांना आर्थिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा झीनत शबरीन यांनी एमपीएससीच्या सचिव सुवर्णा खरात यांना लवकरात लवकर निकाल प्रसिद्ध करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

MPSC : दोन वर्षांपासून उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत; सुवर्णा खरात यांना पत्र

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

लिपिक-टंकलेखक भरतीची (Clerk-Typist Recruitment 2023) जाहिरात प्रसिद्ध होऊन २६ महिने झाले आहेत, तर मुख्य परीक्षा होऊन १४ महिने झाले आहेत. एवढा मोठा कालावधी उलटूनही, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) अद्याप तात्पुरती निवड यादी (Still provisional selection list) (पीएसएल) आणि अंतिम निवड यादी प्रकाशित केलेली नाही. त्यामुळे उमेदवारांना आर्थिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा झीनत शबरीन (Congress Leader Zeenat Shabrin) यांनी एमपीएससीच्या सचिव सुवर्णा खरात (MPSC Secretary Suvarna Kharat) यांना लवकरात लवकर निकाल प्रसिद्ध करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास झालेल्या विलंबामुळे उमेदवारांना सामाजिक, आर्थिक आणि मानसिक त्रास झाला आहे. निवड प्रक्रिया आणि नियुक्तीच्या वेळेबाबतच्या अनिश्चिततेमुळे सर्व उमेदवार निराश आणि चिंताग्रस्त झाले आहेत. म्हणून, आम्ही आयोगाला विनंती करतो की त्यांनी तात्काळ तात्पुरती निवड यादी, निवड रद्द करण्याची यादी आणि अंतिम शिफारस यादी प्रकाशित करून प्रक्रिया जलद करावी जेणेकरून भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करता येईल, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३- लिपिक टंकलेखन व कर सहायक संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या गुणवत्ता याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. एमपीएससी कडून केली जाणारी लिपिक टंकलेखन भरती आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात जास्त पदांची भरती आहे. त्यामुळे हजारो उमेदवारांच्या नजरा या भरतीच्या निवड यादीकडे लागल्या आहेत. या भरतीद्वारे जवळपास ७ हजार ३४ पदांवर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जानेवारी २०२३ मध्ये आठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली होती. त्यात मंत्रालयातील प्रशासकीय विभाग आणि शासनाच्या विविध कार्यालयांतील ७ हजार ३४ लिपिक-टंकलेखक पदांचा समावेश होता. या आठ पदांपैकी सहाच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेले उमेदवार शासनाच्या सेवेत रुजू झाले आहेत. मात्र, ७ हजार ३४ पदांसाठी १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी कौशल्य चाचणी दिलेली असून, त्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यास महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण औरंगाबाद (मॅट) मध्ये आव्हान देण्यात आले. त्यामुळे पात्र तरुणांची अंतिम निवड यादी जाहीर झालेली नाही.