"विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टींसाठी आंदोलन केल्याशिवाय न्याय मिळणारच नसेल तर..."
पुढील महिन्यात घेण्यात येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावर घेण्यात यावी, यासाठी परीक्षार्थी आंदोलन करत आहेत. त्या अनुषंगाने आमदार कैलास पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुढील महिन्यात घेण्यात येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation Recruitment) दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षा (Secondary Engineer and Junior Engineer Examination) TCS ION च्या अधिकृत केंद्रावर (TCS ION Authorized Center) घेण्यात यावी, यासाठी परीक्षार्थी आंदोलन करत आहेत. त्यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांनी 'एक्स' या आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. "विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टींमध्ये आंदोलन केल्याशिवाय न्यायच मिळणार नसेल तर हे कुचकामी सरकार लोकांसाठी काम करत नाही, हा त्याचा सरळसरळ अर्थ आहे," अशी टीका त्यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षा मार्च महिन्यातील २, ३, ८ आणि ९ तारखेला घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावर न घेता खासगी संगणक केंद्रावर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या परीक्षेत भ्रष्टाचार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने खासगी परीक्षा केंद्राऐवजी TCS ION च्या अधिकृत केंद्रावर ही परीक्षा घ्यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, शासन विद्यार्थ्यांच्या या मागणीला जुमानत नसल्याचे समोर येत आहे.
परीक्षेचा अभ्यास करायचा सोडून काही विद्यार्थ्यी त्याच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. महानगरपालिका प्रशासन आणि सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात. परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं असेल तर ही अत्यंत खेदाची बाब आहे. शासनाने याबाबत लवकरात लवकर विद्यार्थ्यांचा मागण्या मान्य करून हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.