स्वाधार योजनेतील तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी आधारापासून वंचित
योजनेचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एका बाजूला विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी अर्ज करता येत नाही, तर दुसऱ्या बाजूला स्वाधार योजनेसाठी केलेला अर्जच दाखल होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सरकारने सुरू केलेल्या स्वाधार योजनेतील (Swadhar Yojana) अडथळ्यांमुळे विद्यार्थी आधारापासून वंचित राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे योजनेचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीचा (Students are deprived due to technical difficulties) सामना करावा लागत आहे. त्यामुळे एका बाजूला विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी अर्ज करता येत नाही, तर दुसऱ्या बाजूला स्वाधार योजनेसाठी केलेला अर्जच दाखल होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.
राज्यभरातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा पदविका, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी शहराकडे ओढा असतो. त्यात शासकीय वसतिगृहांची संख्या व अपुऱ्या प्रवेश क्षमतेमुळे प्रवेश न मिळालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकारने स्वाधारचा आधार दिला आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा आधार मिळत नसल्याने अनेक त्रुटींची पूर्तता करूनही विद्यार्थी स्वाधार योजनेपासून वंचित राहत आहेत. सद्य:स्थितीत स्वाधारचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
या विद्यार्थांना घेता येणार स्वाधार योजनेचा लाभ
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही २०१६-१७ मध्ये सुरू केलेली आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.