धक्कादायक! अभ्यासक्रम तयार नसल्याने लांबले विद्यापीठाचे निकाल;CC चे गुणच मिळाले नाही
विद्यापीठामध्ये प्रभारी राज असल्यामुळे विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाच्या माध्यमातून वेळीच महाविद्यालयांपर्यंत अभ्यासक्रम तयार करून होत झाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित विषय शिकवणे आणि त्या विषयांच्या परीक्षा घेऊन त्यांचे गुण परीक्षा विभागाला पाठवणे यात अडसर निर्माण झाला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मार्च महिना संपत आला तरीही अद्याप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले नाहीत.तसेच अनेक अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज भरण्यासही अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे विद्यापीठात सावळा गोंधळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ओपन इलेक्टिव्ह (OE) आणि को करिक्युलम (CC) या घटकांसाठी अभ्यासक्रम वेळेत उपलब्ध करून दिले गेले नाही. तसेच या अभ्यासक्रमाचे गुण परीक्षा विभागापर्यंत प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाचे निकाल लांबले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवीन शैक्षणिक धोरणामुळे अभ्यासक्रमात तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गुणदान पद्धतीमध्ये बदल करण्यात आला.मात्र, त्यानुसार वेळीच अभ्यासक्रम तयार करून तो विद्यार्थ्यांना शिकवणे आवश्यक होते.तसेच संबंधित अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे गुण परीक्षा विभागापर्यंत पाठवणे गरजेचे होते. मात्र, विद्यापीठामध्ये प्रभारी राज असल्यामुळे विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाच्या माध्यमातून वेळीच महाविद्यालयांपर्यंत अभ्यासक्रम तयार करून होत झाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित विषय शिकवणे आणि त्या विषयांच्या परीक्षा घेऊन त्यांचे गुण परीक्षा विभागाला पाठवणे यात अडसर निर्माण झाला. मात्र या सर्व प्रक्रियेमुळे विद्यापीठाचे निकाल लांबले असून पुढील परीक्षा सुद्धा लांबल्या आहेत.
विद्यापीठात कुलसचिव प्रभारी आहेत. त्याचबरोबर सर्व अधिष्ठाता प्रभारी असून परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांकडे सुद्धा प्रभारी म्हणूनच पदभार देण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कोणत्या घटकांची कशी अंमलबजावणी करावी याबाबत अजूनही गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळेच मार्च महिना उजाडल्यावर काही विषयांचे गुण आमच्याकडे प्राप्त झाले नाही म्हणून परीक्षांचा निकाल लावला गेला नाही, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
---------------
विद्यापीठाच्या आधिसभेत यावरून होणार गोंधळ?
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी बाबत योग्य माहिती प्राध्यापकांपर्यंत पोहोचून धोरणाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करून घेणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून याबाबत आवश्यक खबरदारी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या 27 मार्च रोजी होणाऱ्या अधिसभेत यावर प्रश्न उपस्थित करून विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला जाईल? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
व्यवस्थापन परिषदेकडून निकाल जाहीर करण्याच्या सूचना
नवीन शैक्षणिक धोरणानुसार ज्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेऊन संबंधित विषयांच्या गुणांसह निकाल जाहीर करण्यात अडचणी येत आहेत, अशा विषयांचे गुण पुढील सत्राचा निकाल जाहीर करताना समाविष्ट करून मग निकाल जाहीर करावा, अशा सूचना व्यवस्थापन परिषदेकडून देण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे.