विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ! २०० विद्यार्थ्यांना ठेवलं परीक्षेपासून वंचित

सर्व विद्यार्थ्यांना रात्री उशिरा हॉल तिकीट महाविद्यालयाच्या आयडीवर पाठवण्यात आले आहेत. मात्र, आज उशीरापर्यंत विद्यार्थ्यांना ते मिळाले नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची कसा द्यायची असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ! २०० विद्यार्थ्यांना ठेवलं परीक्षेपासून वंचित

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शिक्षण क्षेत्राला हादरून टाकणारी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील साई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन मॅनेजमेंट महाविद्यालयाचा (Sai Institute of Technology in Management College) मोठा प्रताप समोर आला आहे. या महाविद्यालयाने परीक्षा शुल्क वसूल केले. मात्र, प्रवेशपत्र वाटप (Hall ticket distribution problem) केले नसल्याने तब्बल २०० विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित (200 students deprived of exams) राहावे लागले. या प्रकरणानंतर पालक आणि विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवला असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा औद्योगिक वसाहत येथे साई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन मॅनेजमेंट या नावाने एक महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात एम.सी.एस प्रथम वर्षात एकूण २१० विद्यार्थी शिक्षण घेत असून या त्यांची आज परीक्षा होती. मात्र, अभ्यासाचा आणि परीक्षेचा ताण असताना विद्यार्थ्यांना हॉल तिकीटासाठी इकडे तिकडे भटकण्याची दुसरीच परीक्षा द्यावी लागत आहे.

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थ्यांना रात्री उशिरा हॉल तिकीट महाविद्यालयाच्या आयडीवर पाठवण्यात आले आहेत. मात्र, आज उशीरापर्यंत विद्यार्थ्यांना ते मिळाले नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची कसा द्यायची असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी उकळून व्यवस्थापकांनी फोन, मोबाईल बंद केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. हॉल तिकीटसाठी कॉलेजच्या गेटवर सर्व विद्यार्थी गोळा झाले. मात्र, काहीच हालचाली होत नसल्याने विद्यार्थ्यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

हॉलतिकीट न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात धाव घेतली. या वेळी तुमच्या कॉलेजने परीक्षा शुल्कच भरले नसल्याने हॉलतिकीट मिळाले नसल्याचे सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कॉलेज असा खेळ का खेळत आहे याचे कारण त्यांना समजले नाही. परीक्षा शुल्क भरूनही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट न देणाऱ्या या निष्काळजीपणा दाखवणार्‍या महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

दोनशे विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळाले नसल्यानं कॉलेज समोर या विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला. विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. परीक्षा फी भरूनही परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. यावेळी अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले. कॉलजने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवल्याचा आरोप पालकांनी केला आहे.