अकरावी प्रवेशाची पहिली निवड यादी केव्हा? शिक्षण विभागाची अधिकृत माहिती
अकरावी प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ४० जागा उपलब्ध आहेत. मात्र, प्रवेशासाठी १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत. त्यापैकी संस्था निहाय कोटा आणि अल्पसंख्यांक कोटा यासाठी ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अकरावी प्रवेशाची (11th admission) पहिली निवड यादी उद्या २६ जून रोजी जाहीर (First selection list) करण्याबाबत सायंकाळी ५ पर्यंत अधिकृत माहिती दिली जाईल. निवड यादी संदर्भात टेक्निकल टीम आणि शिक्षण विभागातील अधिकारी काम करत आहेत. सायंकाळपर्यंत काम पूर्ण झाले तर उद्या निवड यादी जाहीर केली जाईल. अन्यथा थोडे मागे पुढे (Timetable change) होऊ शकते, अशी अधिकृत माहिती शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
11th Admission: अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी आता 30 जूनला; प्रवेशासाठी पुन्हा तारीख पे तारीख
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल दरवर्षीपेक्षा पंधरा दिवसांनी आधी जाहीर केला, खरा पण अकरावी प्रवेशाच्या 'तारीख पे तारीख'ला विद्यार्थी आणि पालक वैतागून गेले आहेत. यापूर्वी तीन-चार वेळा तारखा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे २६ जून रोजी तरी अकरावी प्रवेशाची पहिली निवड यादी जाहीर होईल का? हा मोठा प्रश्न आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्या २६ जून रोजी निवड यादी जाहीर होण्याची शक्यता कमी आहे. त्याचे कारण म्हणजे या वेळेपर्यंत तरी शिक्षण विभागाची परीपूर्ण तयारी झाली नसल्याचे बोलले जात आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ४० जागा उपलब्ध आहेत. मात्र, प्रवेशासाठी १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत. त्यापैकी संस्था निहाय कोटा आणि अल्पसंख्यांक कोटा यासाठी ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. त्यामुळे आता २० लाखांपेक्षा अधिक जागांसाठी उर्वरित १२ लाख विद्यार्थ्यांचे या निवड यादीकडे लक्ष लागले आहे.
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील कारभार पूर्णपणे नियोजनशून्य आणि गोंधळाचा ठरताना दिसून येत आहे. वेळापत्रकातील सततच्या बदलामुळे , विद्यार्थी व पालकांना भलताच मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. राज्यात अकरावी प्रवेशासाठी कला शाखेच्या ६ लाख ७२ हजार, वाणिज्य शाखेच्या ५.५ लाख तर विज्ञान शाखेच्या ८ लाख ७० हजार जागा उपलब्ध आहेत. राज्यातील ५२७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तर प्रवेश क्षमतेपेक्षा निम्मे देखील अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे ५ लाखांपेक्षा अधिक जागा यंदा रिक्त राहाणार आहेत.
वेळापत्रकानुसार, 26 जून रोजी अकरावी प्रवेशाची पहिली निवड यादी प्रसिद्ध झाली तर विद्यार्थ्यांना २७ जून ते ३ जुलै या कालावधीत आपला प्रवेश महाविद्यालयात निश्चित करावा लागणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी ५ जुलै रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.