अंगणवाडी भरतीचा मार्ग मोकळा; शंभर दिवसांत भरती प्रक्रिया राबवण्याचे उद्दिष्टे 

महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्यसेविका आणि मदतनीस यांसारख्या रिक्त पदभरतीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी शंभर दिवसांचे उद्दिष्टे ठेवण्यात आले असून या काळात संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडणे आवश्यक आहे. 

अंगणवाडी भरतीचा मार्ग मोकळा; शंभर दिवसांत भरती प्रक्रिया राबवण्याचे उद्दिष्टे 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मागील काही महिन्यांपासून अंगणवाडी भरतीची (Anganwadi recruitment) वाट पाहणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महिला व बालविकास विभागाकडून (Women and Child Development Department) अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्यसेविका आणि मदतनीस यांसारख्या रिक्त पदभरतीचे आदेश (Vacancy filling order) देण्यात आले आहेत. त्यासाठी शंभर दिवसांचे उद्दिष्टे ठेवण्यात आले असून या काळात संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडणे आवश्यक आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसांचे उद्दिष्टे ठरवून दिले आहे. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल, त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०२२ पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस किमान दहावी उत्तीर्ण आहेत, त्यांना सेवा जेष्ठतेनुसार थेट अंगणवाडी सेविका पदी नियुक्त केले जाणार आहे. 

त्यानंतर रिक्त राहिलेल्या सेविका व मदतनीस पदासाठी जाहिरातीद्वारे भरती करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात त्या-त्या ग्रामपंचायतींमधील स्थानिक उमेदवार तर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात तेथील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्वी फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणून निवडले जात होते. आता मात्र महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रात निवड केली जाणार असल्याने मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही, उमेदवारांचे गुणांकन निवडीसाठी महत्ताचे ठरेल.