मुंबई विद्यापीठाची मोठी कारवाई, 'या' ८० काॅलेजमध्ये प्रवेश बंदी?
पुढील शैक्षणिक वर्षापासून अशा कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचा पवित्रा विद्यापीठाने घेतला आहे. तसेच या ८० महाविद्यालयांना दहा हजार रुपयांचा दंड (Fine of ten thousand rupees) ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) महाविद्यालय विकास समिती (सीडीसी) स्थापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ८० महाविद्यालयांवर मोठी कारवाई (Major action against 80 colleges) केली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून अशा कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचा पवित्रा विद्यापीठाने घेतला आहे. तसेच या ८० महाविद्यालयांना दहा हजार रुपयांचा दंड (Fine of ten thousand rupees) ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजांनी विकास समिती स्थापणे बंधनकारक असते. मात्र, ८० महाविद्यालयांकडून त्यासंदर्भात कोणतीही प्रक्रिया राबवली नसल्याने विद्यापीठाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
वारंवार सांगूनही दुर्लक्ष..
मुंबई विद्यापीठाकडून प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेवेळी महाविद्यालय विकास समिती स्थापन करण्याची अट कॉलेजांना घातली जाते. त्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी ही समिती स्थापन केली नाही. समिती स्थापन करण्यासाठी महाविद्यालयांशी वारंवार पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यानंतरही काही बदल न झाल्याने अखेर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
"... तर विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नका"
ही समिती स्थापन न करणाऱ्या महाविद्यालयांत पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थाना प्रवेश देण्यात येऊ नयेत, असा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. तसेच समिती स्थापन न करणाऱ्या सर्व महाविद्यालयांना एकाच वेळी नोटीस देण्याचे निर्देशही दिले आहेत. महाविद्यालय संलग्नता विभागाला केलेल्या कार्यवाहीचा अहवाल २० एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.