पोषण आहारातील खिचडीची आई तपासणार चव; शाळांमध्ये ‘अतिथी माता’ उपक्रम राबवणार

शिक्षण विभागाने नुकताच महाराष्ट्रासह विविध राज्यांतील ‘प्रधानमंत्री पोषण आहार योजने’च्या गेल्या वर्षभरातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. यामध्ये राजस्थानमध्ये राबविण्यात आलेला ‘अतिथी माता’ उपक्रम आणि उत्तर प्रदेशात राबवण्यात आलेल्या ‘माँ समूह’ उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

पोषण आहारातील खिचडीची आई तपासणार चव; शाळांमध्ये ‘अतिथी माता’ उपक्रम राबवणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील शाळांमध्ये मिळणाऱ्या पोषण आहाराच्या (Nutritional food available in schools in the state) गुणवत्तेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात. एवढचं नाही तर अनेक पालकांकडून त्याबाबत तक्रारी देखील केल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर आता  शाळांमध्ये ‘अतिथी माता’ हा उपक्रम (The ‘Guest Mother’ initiative) राबविला जाणार आहे. दररोज एका विद्यार्थ्याची आई शाळेत येऊन पोषण आहाराच्या खिचडीची चव घेणार (Mother will come to school and taste the nutritious khichdi) असून आईला योग्य वाटला तरच तो आहार विद्यार्थ्यांना (students) दिला जाईल.

शिक्षण विभागाने नुकताच महाराष्ट्रासह विविध राज्यांतील ‘प्रधानमंत्री पोषण आहार योजने’च्या गेल्या वर्षभरातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. यामध्ये राजस्थानमध्ये राबविण्यात आलेला ‘अतिथी माता’ उपक्रम आणि उत्तर प्रदेशात राबवण्यात आलेल्या ‘माँ समूह’ उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. शालेय पोषण आहारावर आता पालकांकडूनच नियंत्रण ठेवण्याचा हा उपक्रम सर्वच राज्यांमध्ये राबवण्याबाबत यावेळी शिक्षण सचिवांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून राजस्थानातील उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. आता केंद्रीय यंत्रणेने राजस्थानातील ‘अतिथी माता’ उपक्रम सुरू करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक सत्रात महाराष्ट्रातील शाळांत ‘अतिथी माता’ हजेरी लावण्याची शक्यता आहे.

विविध राज्यातील सचिवांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील ‘स्नेह भोजन’ उपक्रमाची दखल घेण्यात आली. पोषण आहार योजनेत पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्राने २०१८ मध्ये ‘तिथी भोजन’ उपक्रम आणला होता. हा उपक्रम महाराष्ट्रात ‘स्नेहभोजन’ म्हणून शिक्षकांनी अमलात आणला.

पोषण आहाराबाबत झालेल्या बैठकीतील सूचना

  • आहारातील खाद्यतेलाचा वापर १० टक्के कमी करणे
  • धान्याचा किमान एक महिन्याचा ‘बफर स्टॉक’ ठेवणे
  • आहारात कडधान्याचा वापर वाढवावा
  • आहार घेणाऱ्या १०० टक्के मुलांची उंची-वजनाची माहिती नोंदविणे
  • ही माहिती सर्वांगीण विकास पत्रात नोंदविणे
  • आहार वाटपाच्या दैनंदिन माहितीची खातरजमा करणे