'पवित्र'मधून निवड होऊन शिक्षकाची नोकरी नाकारल्यास संस्थेवर मोठी कारवाई; जीआर प्रसिद्ध
पवित्र मधून निवड होऊन नियुक्ती नाकारल्यास अथवा नियुक्ती प्रलंबित ठेवल्यास संबंधित शिक्षणाधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित पद दोन शैक्षणिक वर्षासाठी व्यापगत करण्याची कार्यवाही करावी, असे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीत काही अडचणी येत असल्यामुळे त्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. याबाबतचा अध्यादेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.तर शैक्षणिक संस्थांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मुलाखतीसह निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवारांची निवड केल्यानंतर काही संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रदीर्घ काळापर्यंत प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने याबाबत कठोर निर्णय घेतला आहे. पवित्र मधून निवड होऊन नियुक्ती नाकारल्यास अथवा नियुक्ती प्रलंबित ठेवल्यास संबंधित शिक्षणाधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित पद दोन शैक्षणिक वर्षासाठी व्यापगत करण्याची कार्यवाही करावी, असे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.
मुलाखतीसह निवडीच्या प्रकारात संबंधित संस्थेकडे उमेदवारांची शिफारस केल्यानंतर उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी व पर्यायाने पुढील प्रक्रिया करण्यासाठी जात नाहीत परिणामी त्या संस्थेची पदे रिक्त राहतात. त्यावर शिक्षण विभागाने सुधारणा केली आहे. त्यानुसार मुलाखतासह निवड प्रक्रियेत व्यवस्थापनांना १:३ या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, त्यानुसार उमेदवारांची देखील त्यांनी लॉक केलेल्या प्राधान्यक्रमांपैकी गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त ३ प्राधान्यक्रमावर शिफारस होईल.
एखादया संस्थेस मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात रिक्त जागांच्या प्रमाणात पर्याप्त उमेदवार उपलब्ध करुन दिल्यानंतर सदर निवड प्रक्रिया संबंधित संस्थेने शिफारस यादी प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. उपरोक्त प्रमाणे निवड प्रक्रिया राबविल्यानंतरही उपलब्ध उमेदवारांमधून पद भरणे शक्य नसल्यास अशी रिक्त पदे, त्या पदांचा गट, विषय, आरक्षण व अन्य तपशिलांसह पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विहित केलेल्या कालावधीत नोंदविणे आवश्यक राहील. अशा रिक्त पदांसाठी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिला आहे व ज्यांची कोणत्याही प्रकारात नियुक्तीसाठी निवड झालेली नाही, अशा उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार विहित केलेल्या प्रमाणात पोर्टल मार्फत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येईल.