'सरहद्द शौर्यथॉन-2025' स्पर्धा: द्रासच्या भारतीय लष्करी तळावर 'लेझर शो' साठी शासनाकडून 3 कोटींची मदत
कारगिलच्या युद्धात भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत आपल्या मायभूमीचे रक्षण केले. भारतीय सैन्यदलांचे शौर्य, धाडस आणि बलिदान यांना सलाम करण्यासाठी या शौर्यथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
कारगिल युद्धाची युद्धभूमी द्रास येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी यासाठी सरहद संस्थेच्या पुढाकाराने तयार करण्यात येत असलेल्या 'लेझर शो'च्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने तीन कोटींचा निधी देण्याचे एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी मुख्यमंत्री असताना जाहीर केले होते.यंदा कारगिलच्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी गेले असता आपण दिलेला शब्द पाळत त्यांनी हा तीन कोटींचा निधी आज भारतीय सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.
कारगिल युद्धाला २६ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय सैन्यदल, सरहद संस्था, पुणे तसेच अर्हम फाऊंडेशनच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या 'सरहद शौर्यथॉन-२०२५' या स्पर्धेचे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लेह १४ कॉप्स कमांडर,संजय नहार, कारगिलचे चीफ एक्झिक्युटिव्ह काउन्सेलर डॉ जफर आखून, कारगिल चे जिल्ला अधिकारी राकेश कुमार, अर्हम फाऊंडेशनचे डॉ.शैलेश पगारिया, संजीव शहा गजानन पाटील, कौन्सेलर फिरोज खान यांनी झेंडा दाखवून उद्घाटन केले. यावेळी भारतीय सैन्यदलातील व कारगिल ,द्रास येथील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कारगिलच्या युद्धात भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत आपल्या मायभूमीचे रक्षण केले. भारतीय सैन्यदलांचे शौर्य, धाडस आणि बलिदान यांना सलाम करण्यासाठी या शौर्यथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे समुद्रसपाटीपासून १० हजार ८०० फूट उंचीवर ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील तीन हजार धावपटू सहभागी झाले होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रेस डायरेक्टर सुमंत वाईकर टेक्निकल डायरेक्टर वसंत गोखले , अनुज नहार , जाहिद भट्ट, सुयोग गुंदेचा यांनी विशेष योगदान आहे
या स्पर्धेबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करणे आणि कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण करणे हाच उद्देश आहे.तसेच या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणाऱ्या सरहद संस्थेचे त्यांनी आभार मानले.
द्रास येथील लष्करी तळावर 'लेझर शो'च्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा तीन कोटींचा धनादेश लष्कराचे कोअर लेफ्टनंट कमांडर हितेश भल्ला यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला. गतवर्षी मुख्यमंत्री असताना आपण कारगिलला आलो असता या लेझर शोसाठी निधी देण्याचे आपण मान्य केले होते. त्यानुसार आपण दिलेला शब्द पाळल्याचे त्यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. या सरहद शौर्यथोन साठी , सुहाना स्पाईसेस, स्वानंद फाउंडेशन व ऊर्जा बायोगॅस सिस्टम यांचे विशेष योगदान लाभले