'एमबीबीएस'चा सलग तिसरा पेपर फुटला, तासाभरात नवीन प्रश्नपत्रिका

सलग तिसरा पेपर फुटल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, पेपर नक्की फुटला आहे की विद्यापीठ प्रशासनाला त्रास देण्यासाठी कोणीतरी हा खोडसाळपणा केला आहे ,अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

'एमबीबीएस'चा सलग तिसरा पेपर फुटला, तासाभरात नवीन प्रश्नपत्रिका

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे (Maharashtra University of Health Sciences) सुरू असलेल्या हिवाळी सत्र परीक्षेत सलग तिसऱ्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा सातत्याने ई-मेल येत आहेत. यामुळे अचानक परीक्षा नियोजनात बदल करण्याची वेळ विद्यापीठावर येत आहे. त्यामुळे विद्यापीठाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. एमबीबीएस द्वितीय वर्षाचा (MBBS 2nd year) पेपर फुटल्याचा (Paper leak) ई-मेल विद्यापीठाला सातत्याने येत आहे. सलग तिसरा पेपर फुटल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, पेपर नक्की फुटला आहे की विद्यापीठ प्रशासनाला त्रास देण्यासाठी कोणीतरी हा खोडसाळपणा केला आहे, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा २ डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत. ३ डिसेंबर रोजी एमबीबीएसचा दुसऱ्या वर्षाचा पहिला पेपर फार्माकॉलॉजी - १ घेण्यात आला. परंतु, हा पेपर सुरू होण्यापूर्वीच एक तास आधी फुटल्याची माहिती विद्यापीठाला ई-मेलद्वारे देण्यात आली. त्यामुळे हा पेपर रद्द करून तो १९ डिसेंबरला घेणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी पुन्हा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याची अफवा पसरल्याने प्रश्नपत्रिका बदलण्यात आली. या घटनेचा पोलीस तपास सुरू असतानाच पुन्हा पॅथॉलॉजी - २ विषयाचा पेपर फुटल्याचा ई -मेल विद्यापीठाला मिळाला. ई -  मेल पेपर सुरू होण्यापूर्वी एक तास आधी मिळाल्यामुळे, विद्यापीठाने तातडीने दुसरा पेपर सर्व परीक्षा केंद्रांना पाठविला. मात्र, त्यासाठी अर्धा तास उशीरा पेपर घेण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर ओढवली. 

कोणत्याही महाविद्यालयात प्रश्नपत्रिका पाठवण्यात येत असताना प्रारंभी त्या प्रत्यक्ष स्वरूपात पाठवण्यात येतात. महाविद्यालयाचे प्राचार्य कॅमेऱ्याच्या समोर चार प्राध्यापकांसमोर त्या सीलबंद प्रश्नपत्रिका उघडतात. त्यानंतर त्याचे वाटप केले जाते. अशा परिस्थितीत प्रश्नपत्रिका कशी लीक होऊ शकते याबाबत साशंकता व्यक्त होत असून, विद्यापीठाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.