गृह विभागाचा मोठा निर्णय : पोलिसांना हंगामी सेवेसाठी मुदतवाढ, भरतीला विलंब?
राज्यातील पोलिस भरतीला विलंब लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारण गृह विभागाने बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात सध्या कार्यरत ३ हजार पोलिसांना हंगामी सेवेसाठी मुदतवा देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील पोलीस भरतीला (Police recruitment) विलंब लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारण गृह विभागाने बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात (Brihanmumbai Police Commissionerate) सध्या कार्यरत असलेल्या ३ हजार पोलिसांना हंगामी सेवेसाठी मुदतवाढ (Extension of tenure for 3 Thousand policemen) देण्यास मान्यता दिली आहे. याचाच अर्थ पोलीस भरती काही महिने लांबणीवर पडणार आहे. राज्यातील १३ कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी २४ तास पोलीस आपली जबाबदारी पार पाडतात. मात्र, मुंबई पोलिसांत हजारो पदे रिक्त (Thousands of posts vacant in Mumbai Police) असून कायमस्वरूपी पदे भरण्याची प्रक्रिया मंद गतीने सुरू आहे.
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात सध्या कार्यरत तीन हजार पोलिसांना हंगामी सेवेसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. राज्याची लोकसंख्या १३ कोटींच्या घरात पोहोचली आहे. मात्र, राज्याच्या गृहविभागात २ लाख १९ हजार ८२२ पोलिसांची पदे मंजूर आहेत. सध्या त्यापैकी १ लाख ९८ हजार ८०७ पदे भरण्यात आली आहेत. तरी २१ हजार १०८ पदे रिक्त आहेत.
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांची ४० हजार ६२३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी पोलीस शिपाई संवर्गाची सुमारे १० हजार पदे रिक्त असून, मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील उपलब्ध मनुष्यबळ सर्व प्रकारच्या दैनंदिन कर्तव्यांसाठी अपुरे पडत आहे. शासन निर्णय २१ जानेवारी २०२१ अन्वये बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी ७ हजार ७६ पोलीस शिपाई संवर्गातील व पोलीस चालक संवर्गातील ९९४ पदे भरण्यास मंजुरी दिली होती. तर प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू असलेली ७ हजार ७६ पदे वगळल्यानंतरही सुमारे ३ हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून भरण्यात आलेल्या ३ हजार मनुष्यबळाकरिता ११ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.