पुढच्या वर्षी बदलणार पहिलीची पुस्तके; एनईपी अंमलबजावणीला अखेर सुरूवात

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय स्तर 2024 मधील तरतुदी योग्य त्या बदलांसह टप्प्याटप्प्याने लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पुढच्या वर्षी बदलणार पहिलीची पुस्तके; एनईपी अंमलबजावणीला अखेर सुरूवात

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशात व राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवले जात असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केव्हा होणार, असे प्रश्न उपस्थित होत होते. अखेर या प्रश्नाचे उत्तर शिक्षण विभागाने दिले आहे. राज्यातील शाळांमध्ये नवीन अभ्यासक्रमांची अंमलबजावणी केव्हा होणार?  या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा अध्यादेशानुसार 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याप्रमाणे इयत्ता पहिलीची नवी पाठ्यपुस्तके 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध होणार आहेत. तर २०२६- २७ या शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी, चौथी व सहावीची पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील. त्यानंतर 2027- 28 या वर्षात पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असून आठवी, दहावी आणि बारावीची पाठ्यपुस्तके 2028-29 या शैक्षणिक वर्षात उपलब्ध होणार आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय स्तर 2024 मधील तरतुदी योग्य त्या बदलांसह टप्प्याटप्प्याने लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. बाल वाटिका एक दोन तीन राबवण्याविषयी महिला व विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे. राज्यात 'एनईपी'ची अंमलबजावणी केव्हा होणार?  विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके केव्हा उपलब्ध होणार?  ती पुस्तके सीबीएससी अभ्यासक्रमाची असतील किंवा नसतील याबद्दल अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात निर्माण झाले होते. त्यावर शिक्षण विभागाने अध्यादेश प्रसिद्ध करत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ मधील तरतुदीनुसार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली पाठ्यपुस्तके, महाराष्ट्र राज्यासाठी आवश्यक असे सर्व बदल करून स्वीकारण्यात यावीत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत नमूद पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असणे, आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारसरणी वाढविण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे, अनुभवात्मक शिक्षण, इत्यादी बाबीचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये असणे आवश्यक आहे. तसेच मूल्यमापन, अध्यापन पद्धती, वेळापत्रक, निरीक्षण व सनियंत्रण, शिक्षकांचे प्रशिक्षण, इ. सर्वांगीण बाबीमध्ये आवश्यक त्या सुधारणा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत निर्गमित करण्यात याव्यात.

बालभारतीची पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये वेळोवेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संबंधित विभाग प्रमुख व विषय तज्ञ यांचा सहभाग असावा. सदर पाठ्यपुस्तके ही निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्तींची पूर्तता करणारी व अंमलबजावणीसाठी योग्य आहेत किंवा कसे याची पडताळणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी करावी. त्यानंतर सदर अंतिम पाठ्यपुस्तकांना आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समन्वय समितीची मान्यता घ्यावी. राज्यस्तरीय समन्वय समितीचे मान्यतेनंतरच पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करता येईल.

अंमलबजावणी वेळापत्रकानुसार, इयत्तानिहाय पाठ्यपुस्तके आवश्यक सर्व माध्यमांत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची राहील. पाठ्यपुस्तकांना पूरक साहित्य, हस्तपुस्तिका इ. निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत करण्यात यावी.  बालवाटिका १. २. ३ चा पाठ्यक्रम, पाठ्पसाहित्य, आशय, इ. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पूणे कार्यालयाने तयार करून महिला व बाल विकास विभागाकडे छपाई व वितरणासाठी सुपूर्द करावा.