विद्यार्थी आले; मात्र शाळेला टाळे; 12 शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई 

करंजावणे, अडवली आणि अडवली गावठाणमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सकाळी साडे आठपर्यंत म्हणजेच शाळा भरल्यानंतर दीड तास शिक्षकच शाळेत पोचले नव्हते. शेवटी शिक्षणाधिकाऱ्यांनी तीन शाळेतील १२ शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. 

विद्यार्थी आले; मात्र शाळेला टाळे; 12 शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

वेल्हे तालुक्यातील शाळांना शनिवारी शिक्षणाधिकारी संजय नाईकडे (Education Officer Sanjay Naikwade) यांनी भेट दिली यावेळी विद्यार्थी आलेले दिसले.मात्र, शाळेलाच टाळे (School closed) दिसले. करंजावणे, अडवली आणि अडवली गावठाणमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सकाळी साडे आठपर्यंत म्हणजेच शाळा भरल्यानंतर दीड तास शिक्षकच शाळेत पोचले नव्हते. शेवटी शिक्षणाधिकाऱ्यांनी तीन शाळेतील १२ शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई (Disciplinary action against 12 teachers) करण्याचा निर्णय घेतला. 

नियमाप्रमाणे शनिवारी शाळा सकाळी सात वाजता भरते. विद्यार्थी वेळेवर आले, पण शाळेला टाळे होते. त्यामुळे मुलांनी बंद दरवाजाच्या शेजारी भिंतीवर दप्तर टांगले, आणि खेळत बसले. यावेळी शिक्षणाधिकारी नाईकडे यांनी या शाळांना अचानक भेट दिली. मुलांना शिक्षक कुठे आहेत, असे विचारल्यावर, "अजून आलेच नाहीत," असे विद्यार्थ्यांनी सांगितले. काही वेळ शिक्षणाधिकारीही गुरुजींची वाट बघत थांबले. पण कसले, साडेआठ वाजले तरी गुरुजींचा पत्ताच नाही. शिक्षणाधिकारी यांना प्रकार थोडा वेगळा वाटला म्हणून, त्यानी शेजारच्या गावच्या शाळांना भेट दिली तर तिथे देखील हीच परिस्थिती पाहायला मिळाली. शेवटी शिक्षणाधिकाऱ्यांनी ३ शाळेतील १२ शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई केली.  

शिक्षणाधिकारी एवढ्यावरच थांबले नाहीत.त्यांनी वेल्हे तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वागदरा, भट्टी, नाळवट, पासली येथील शाळांना देखील भेटी दिल्या, येथे मात्र सर्व १०० टक्के शिक्षक उपस्थित असल्याचे समोर आले. या शाळांवर नव्याने नियुक्त केलेले शिक्षक होते. एका बाजूला काही शिक्षक चांगले काम करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मात्र शिक्षकांच्या निरूत्साहामुळे मुले अप्रगत राहत आहेत. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. मात्र, यानिमित्ताने काही शिक्षकांच्या उदासीनतेमुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाण्याची भीती निर्माण झाली आहे.