मोठी बातमी: इंजिनिअरिंगसह सर्व अभ्यासक्रमासाठी 'कॅरी ऑन' चा निर्णय; SPPU विद्यापीठाचे परिपत्रक प्रसिध्द

सुमारे 30 ते 40 हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार आहे.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची 'कॅरी ऑन' ची मागणी मान्य करण्यात आली आहे.

मोठी बातमी:  इंजिनिअरिंगसह सर्व अभ्यासक्रमासाठी 'कॅरी ऑन' चा निर्णय; SPPU विद्यापीठाचे परिपत्रक प्रसिध्द

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील हिवाळे सत्र 2024 आणि उन्हाळी सत्र 2025 परीक्षेत जे विद्यार्थी प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील बॅक लॉग राहिल्याने तृतीय,चतुर्थ,पाचव्या वर्षात प्रवेश घेण्यास पात्र नाहीत, अशा सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेची विशेष संधी (Special exam opportunity for students) देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. तसेच त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे सुमारे 30 ते 40 हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार आहे.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची 'कॅरी ऑन' ची मागणी मान्य (Students demand for carry on accepted)करण्यात आली आहे.

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी गेल्या तीन महिन्यात 'कॅरी ऑन' च्या मागणीसाठी तीन वेळा मोठ्या संख्येने आंदोलन केले. 'एनएसयुआय' सह विविध विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी विद्यार्थ्यांची आंदोलन स्थळी भेट घेतली. तसेच त्यांना विशेष संधी दिल्याबद्दल परिपत्रक दिले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकाच जल्लोष केला.

आउटलुक ICARE रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात तिसरे; मुंबई विद्यापीठ 26 , शिवाजी विद्यापीठ 40 व्या क्रमांकावर

विद्यापीठाने प्रसिध्द केलेल्या पत्रानुसार केवळ शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील हिवाळी सत्र (ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२४) आणि उन्हाळी सत्र (एप्रिल/मे २०२५) परीक्षेत जे विद्यार्थी प्रथम/व्दितीय/तृतीय वर्षातील अनुशेष कायम (विषय बॅकलॉग) राहिल्याने तृतीय/चतुर्थ/पाचव्या वर्षात प्रवेश घेण्यास पात्र नाहीत, अशा सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांशी संबंधित विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणा-या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राकरिता, व्दितीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणा-या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या सातव्या सत्राकरिता, तृतीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणा-या विद्यार्थ्यांना पाचव्या वर्षाच्या नवव्या सत्राकरिता तात्पुरता प्रवेश तसेच वरील वर्गात तात्पुरता प्रवेश देण्याची पात्रता ही सम सत्र २०२४-२५ च्या (म्हणजे उन्हाळी सत्र परीक्षा २०२४-२५) परीक्षांच्या निकालाऐवजी विषम सत्र २०२५-२६ च्या (म्हणजे हिवाळी सत्र परीक्षा २०२५-२६) निकालांवर ठरविण्यात यावी.

तात्पुरता प्रवेश हा काही अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात यावा आणि अशा प्रकारे उपरोक्त वर्गात प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे विषम सत्राचे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी सदर विद्यार्थ्यांची असेल व त्याबाबतचे हमीपत्र प्रवेश घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांने महाविद्यालयाकडे सादर करणे अनिवार्य करावे. तात्पुरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी उदा. अध्ययन, अध्यापन, प्रात्यक्षिके, सत्रकार्य, क्षेत्रभेट व इतर बाबी महाविद्यालयाने इतर नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे पूर्ण करुन घ्याव्यात. त्याबाबतच्या परीक्षा व इतर बाबी या हिवाळी सत्र २०२५-२६ या परीक्षेमध्ये प्रथम/व्दितीय/तृतीय वर्षातील अनुशेषाचे विषय पूर्णतः उत्तीर्ण होऊन जे विद्यार्थी प्रचलित तृतीय/चतुर्थ/पाचव्या वर्षामध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतील, अशाच विद्यार्थ्यांच्या सत्र ५/७/९ मधील अध्ययन, अध्यापन, प्रात्यक्षिके, सत्रकार्य, क्षेत्रभेट व इतर बाबी, परीक्षेमधील संपादणूक ग्राहय धरण्यात यावी,असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

अशा प्रकारे पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या विषम (हिवाळी) व सम (उन्हाळी) सत्राच्या परीक्षा एकत्रित सम (उन्हाळी) सत्राच्या परीक्षांसोबत (सन २०२५-२६) घेतल्या जाणार आहेत. जे तात्पुरते प्रवेशित विद्यार्थी हिवाळी २०२५-२६ मधील परीक्षेमध्ये त्यांचे प्रथम/व्दितीय/तृतीय वर्षाचे अनुषंगिक अनुशेष पूर्ण (बॅकलॉग) करु शकणार नाहीत आणि प्रचलित नियमानुसार तृतीय वर्षाच्या पाचव्या/चतुर्थ वर्षाच्या सातव्या व पाचव्या वर्षाच्या नवव्या सत्राकरिता अपात्र ठरतील, अशा विद्यार्थ्यांचा तात्पुरता प्रवेश हा आपोआप रद्द होईल. त्याकरिता जमा शैक्षणिक शुल्क व इतर बाबी यांचा परतावा दिला जाणार नाही. हा निर्णय अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये केवळ शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिताच लागू राहतील व या निर्देशांचा संदर्भ पुढील वर्षामध्ये घेता येणार नाही.ज्या अभ्यासक्रमांस शिखर संस्थांची परवानगी असेल अशा अभ्यासक्रमांना त्या त्या शिखर संस्थांच नियम लागू राहतील, असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.