पालिकेच्या वसतीगृहातील दोन विद्यार्थ्यांचा अकाली मृत्यू

पालिकच्या दूर्लक्षामुळे दोन तरुण विद्यार्थी मृत्यूमुखी पडत असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.

पालिकेच्या वसतीगृहातील दोन विद्यार्थ्यांचा अकाली मृत्यू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation)घोले रोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहातील (Dr. Babasaheb Ambedkar Student Hostel)दोन विद्यार्थ्यांचा डेंग्यू व कावीळ होऊन अकाली मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी दोघेही वसतिगृहातच राहत होते. त्यात आता वासतीगृहातील इतरही काही विद्यार्थी आजारी असल्याचे आढळून आले आहे. 

या विद्यार्थ्यांचा मृत्यू वसतिगृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बेजबाबदारपणामुळे झाला असून वसतिगृहातील अस्वछता विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानिकारक ठरत आहे. पालिकच्या दूर्लक्षामुळे दोन तरुण विद्यार्थी मृत्यूमुखी पडत असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे. या वसतीगृहातील कर्मचारी अतिशय मस्तवाल आणि उद्धटपणे विद्यार्थ्यांशी वागतात असल्याच्या तक्रारी काही विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. 

वसतीगृहात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून प्रचंड प्रमाणात डास आहेत. पिण्याचे स्वच्छ पाणी विद्यार्थ्यांना मिळत नाही. पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये आळ्या झाल्याचा दावा केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या वापरण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये देखील आळ्या झाल्या असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. वसतीगृहातील खोल्यांची व स्वच्छता गृहांची स्वच्छता नीट होत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत.
 
मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती : 

- सिद्धांत दीपक खैरे हा विद्यार्थी सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज येथे पहिल्या वर्षात शिकत होता. शुक्रवारी रात्री दोन वाजता त्याला अचानक उलट्या झाल्या. त्याला पोटातील कावीळ झाल्याचे निदान झाले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

- वेदांत सोनुने हा विद्यार्थी मॉडर्न कॉलेजमध्ये BA अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. १ ऑगस्ट दिवशी त्याला ताप, उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. पूना हॉस्पिटल येथे त्याला ऍडमिट करण्यात आले होते. ३ ऑगस्ट ला दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

वरील दोन्ही विद्यार्थ्यांच्या मृत्यूची घटना दुःखदायक आहे. ग्रामीण भागातून शिकायला येणाऱ्या व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीकडे व सोयीसुविधाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष नाही ही गंभीर बाब आहे. सामाजिक विकास विभागाचे उप आयुक्त व वसतीगृहाच्या रेक्टरचे तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी केली जात आहे. तसेच गरीब परिवाराचा आधार बनणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या परिवाराचे देखील कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन्ही मृत विद्यार्थ्यांच्या परिवारास तात्काळ १० लाख रुपयांची मदत द्यावी. तसेच, वरील जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी संघटनांकडून देण्यात आला आहे.