सहा हजार काॅलेजमध्ये होणार 'संविधान गौरव महोत्सव'

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाद्वारे ६ हजार महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारी २०२५ मध्ये संपूर्ण महिनाभर 'संविधान गौरव महोत्सवा'चे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आहे. 

सहा हजार काॅलेजमध्ये  होणार 'संविधान गौरव महोत्सव'

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारताने राज्यघटना स्वीकारली या घटनेला २६ नोव्हेंबर २०२४ रोजी ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात येऊन येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी या ऐतिहासिक घटनेस ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार व कर्तव्यांची माहिती समाजातील सर्व सामान्यापर्यंत पोहोचविणे हा यामागील उ‌द्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) उच्च व तंत्र शिक्षण विभागाद्वारे ६ हजार महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारी २०२५ मध्ये संपूर्ण महिनाभर 'संविधान गौरव महोत्सवा'चे (Constitution Celebration) आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रेस नोटद्वारे दिली आहे. 

भारतीय राज्यघटनेने भारताला एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले. भारताच्या इतिहासातील या ऐतिहासिक परिवर्तनात्मक क्षणाचा सन्मान करण्यासाठी फेब्रुवारी २०२५ मध्ये संपूर्ण महिनाभर संविधान गौरव महोत्सव साजरा करण्याचे आयोजित केले आहे. या महोत्सवाचा उद्देश राज्यघटनेतील मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करणे आणि नागरिकांना त्यांच्या घटनात्मक अधिकार व कर्तव्यांचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे असा असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

सर्वांसाठी व जगभरातील लोकशाही-प्रेमी नागरिकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. लोकशाहीचा सण मोठ्या अभिमानाने साजरा करण्याचा हा प्रसंग आहे. राज्यघटनेअंतर्गत ७५ वर्षांचा प्रवास उल्लेखनीय आहे आणि या प्रवासाच्या केंद्रस्थानी आपल्या संविधान निर्मात्यांची व्यापक दृष्टी आहे, ज्यांचे योगदान देशाच्या भावी वाटचालीसाठी आपल्याला मार्गदर्शन करीत राहील. राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये संविधान गौरव महोत्सव साजरा करणे हा खरोखरच एक महत्त्वाचा प्रसंग असल्याचे चंद्रकांत पाटील नमूद केले आहे. 

महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालक, शहरी/ग्रामीण/आदिवासी भागातील सर्व सामान्य नागरिक/नागरिकांना भारतीय राज्यघटनेची ओळख होणे, नागरी कर्तव्ये व अधिकार या बाबत माहिती व्हावी तसेच राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकार व कर्तव्यांची माहिती समाजातील सर्व सामान्यापर्यंत पोहोचविणे या उ‌द्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेल्या एकूण ६ हजार महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारी २०२५ मध्ये संपूर्ण महिनाभर 'संविधान गौरव महोत्सव' अंतर्गत खालील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच संविधानाच्या ७५ वर्ष पूर्ततेनिमित राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांमधून तज्ञांच्या व्याखानांचे आयोजन करण्यात केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. 

महिनाभर या कार्यक्रमांचे केले जाणार आयोजन 

"भारतीय राज्यघटनेची ओळख" या विषयावर निबंध स्पर्धा व वत्कृत्व स्पर्धाचे आयोजन करणे. भारतीय राज्यघटनेवर प्रश्नमंजुषा आयोजित करणे. भारतीय राज्यघटनेसंदर्भात पोस्टर / भित्तीपत्रके स्पर्धांचे आयोजन करणे. राज्य घटनेच्या विविध बाबी संदर्भात चर्चासत्र, कार्यशाळा, परिषदांचे आयोजन करणे. महावि‌द्यालयांमध्ये राज्य घटनेविषयीचे अभ्यासक, विषयतज्ञ यांना निमंत्रित करून त्यांची व्याख्याने आयोजित करणे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महावि‌द्यालयांनी सर्व सामान्यांपर्यंत राज्यघटना पोहोचवावी या करिता जनजागृती अभियान राबविणे. राज्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये राज्यघटने विषयी व्याख्याने आयोजित करणे.