महाविद्यालयीन विद्यार्थ्याची रूममध्ये  घुसून गळा चिरून हत्या

छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षणासाठी आलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची रूममध्ये घुसून धारदार शस्त्राने हत्त्या करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्याची रूममध्ये  घुसून गळा चिरून हत्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतानाच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar Crime News) येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात शिक्षणासाठी आलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची (Murder of a college student) रूममध्ये घुसून धारदार शस्त्राने हत्त्या करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. 

महाविद्यालयातील मुलांशी झालेल्या किरकोळ वादानंतर 19 वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या विद्यार्थ्यांची अज्ञातांनी निघृण हत्या केली. प्रदीपच्या हत्येला कॉलेजमध्ये झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री शहरातील उस्मानपुरा भागातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 

प्रदीप निपटे हा देवगिरी महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. तो मुळ बीड जिल्ह्यातील माजलगावच्या पिंपरखेड येथील रहिवासी आहे. त्याचा एक मावस भाऊ आणि अन्य तीन मित्र, असे पाच जण भाजीवालीबाई पुतळ्याजवळील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेऊन किरायाने राहत होते. उस्मानपुरा भाग हा शहरातला सर्वात गजबजलेला भाग असून महाविद्यालयीन मुले येथे मोठ्या प्रमाणात किरायाने रुम करून राहतात. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी प्रदीप व त्याचे मित्र महाविद्यालयातून रूमवर आले. सायंकाळी त्याचा भाऊ आणि अन्य मित्र बाहेर गेले. प्रदीप मात्र एकटाच फ्लॅटवर थांबला होता. रात्री 10 वाजता ते खोलीवर परतले. तेव्हा प्रदीप गळा कापलेल्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी मृत ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. तसेच अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत. 

शनिवारी महाविद्यालयातील मुलांची आणि प्रदीपच्या मित्रांची एकटक का पाहतो, तू कॉलर का उडवतो, अशा किरकोळ कारणांवरून वाद होऊन हाणामारी झाली होती. या प्रकरणामुळे पुढील प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात कोयता गँगची दहशत वाढल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. किरकोळ कारणांमधून होणारे जीवघेणे हल्ले वाढले असताना या टोळ्यांवर जरब कशी बसवायची हा प्रश्न पोलिसांसमोर आहे.