जूनी पेन्शन: दहावी- बारावीच्या परीक्षा होणार; निकाल मात्र लांबणार ?
शिक्षकांकडून परीक्षा सुरळीतपणे घेण्याचे काम केले जाणार आहे. परंतु, उत्तरपत्रिका ताब्यात घेण्याच्या व उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर पूर्णपणे बहिष्कार असणार आहे, असा निर्णय पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने घेतला आहे.
राज्यातील सर्वच विभागांसह शिक्षण विभागातील कर्मचारी सुद्धा जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. त्याचा परिणाम इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षावर होईल का ? अशी भीती विद्यार्थी व पालकांना वाटत आहे.मात्र, शिक्षकांकडून परीक्षा सुरळीतपणे घेण्याचे काम केले जाणार आहे. परंतु, उत्तरपत्रिका ताब्यात घेण्याच्या व उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर पूर्णपणे बहिष्कार असणार आहे, असा निर्णय पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने घेतला आहे.

दीर्घ काळापासून प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यांसाठी 14 मार्चपासून राज्यातील सरकारी नीम सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महापालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायती कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत या संपात पुणे जिल्हा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यासाठी सर्व संघटनांनी समन्वय समिती स्थापन केली आहे. सर्व संघटनांनी समन्वय समिती स्थापन केली असून या समितीच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी संपात सहभागी होत आहेत. मंगळवारी (दि.१४) मध्यवर्ती इमारत विधान भवन नवीन जिल्हा परिषद कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला.
इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घातल्यास सर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे जातील. साधारणपणे इयत्ता बारावीच्या तीन तर दहावीच्या पाच विषयांची परीक्षा राहिली आहे. त्यामुळे परीक्षेचे कामकाज करण्याचे शिक्षक संघटनांनी निश्चित केले आहे. परंतु, इतर शासकीय कामकाजावर बहिष्कार घातला जाणार आहे. त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विविध जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी नियमित हजेरीपटावर उपस्थितीची स्वाक्षरी करायचे नाही तर स्वतंत्र हजेरी पत्रक तयार करून त्यावर उपस्थितांची स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-----------------
इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षांच्या आयोजनाचे कामकाज सोडून इतर सर्व शैक्षणिक कामकाजावर बहिष्कार घातला जाणार आहे. मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काळा पिती लावून आंदोलनात सहभागी होणार आहेत. विद्यार्थी हिताचा विचार करून दहावी बारावीच्या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे.
-महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ
-----
जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेली बैठक निष्फळ ठरली. शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शिक्षक संघटनांनी बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 14 मार्चपासून शिक्षकांकडून दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला जात आहे. परंतु परीक्षेच्या आयोजनाचे काम केले जाणार आहे.
- संजय शिंदे, अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना