BMC अभियंता भरतीमधील गैरप्रकार व पेपरफुटी रोखण्यासाठी परीक्षा रद्द करा
मुंबई महापालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता यांच्या होऊ घातलेल्या सरळसेवा भरती परीक्षेच्या संभाव्य पेपरफुटी घोटाळ्याची दखल घेऊन तत्काळ परीक्षा रद्द करावी,अशी मागणी म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन या संघटनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई महापालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता (Mumbai Municipal Corporation Engineer Recruitment) यांच्या होऊ घातलेल्या सरळसेवा भरती परीक्षेच्या संभाव्य पेपरफुटी घोटाळ्याची दखल घेऊन तत्काळ परीक्षा रद्द (The exam should be canceled) करावी. तसेच नव्याने अधिकृत TCS ION Digital केंद्रावर घेण्यात यावी, अशी मागणी म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन या संघटनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे. ही परीक्षा अभियंता विभागामार्फत घेण्यात येणार आहे. त्यासाठी वेळापत्रक व परीक्षा केंद्र नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून खास करून खाजगी परीक्षा केंद्राबाबतीत तीव्र आक्षेप घेण्यात येत आहे.
काही परीक्षा केंद्रे ही निर्मनुष्य, पत्राच्या शेडमध्ये व कोणत्याही सुविधा नाहीत अशा ठिकाणी देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संशय निर्माण होत आहे. तसेच परिक्षेचे हॉल तिकीट देतानाही कोणत्याही प्रकारे पडताळणी न करता एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्हामध्ये परीक्षा केंद्र देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पैसा व वेळेचा अपव्यय होत असल्यामुळे प्रचंड मनस्ताप झालेला आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द केल्याने संभाव्य गैरप्रकार रोखता येतील.
गेल्या ३/४ वर्षांत तलाठी, WCD, वन विभाग व इतर परीक्षा TCS/IBPS या शासनाने नेमलेल्या संस्थांनी स्थानिक संगणक केंद्राच्या माध्यमातून घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात पेपरफुटी/घोटाळा झाल्याचा इतिहास आहे. या घोटाळ्यांमुळे राज्यातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला होता व फेर परीक्षा घेण्याची नामुष्की महाराष्ट्र शासनावर ओढावली होती, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य करून संभाव्य पेपरफुटी घोटाळा थांबवण्यासाठी तात्काळ कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
________________________________
मुंबई महापालिकेमधील कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी येत्या ९ फेब्रुवारीला IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ऑप्शन मध्ये भरलेली सेंटर सोडून त्यांना भलतेच सेंटर देण्यात आले आहेत. पुण्याच्या मुलांना भंडारा, नागपूर अशा लांबच्या ठिकाणची सेंटर देण्यात आली आहेत. काही सेंटर तर अत्यंत गैरसोयीच्या आणि अडचणीच्या ठिकाणी देण्यात आले आहेत. जिथे गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे ही परीक्षा TCS ION Digital सेंटर्समध्ये घेण्यात यावी जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील. राज्य शासनाने तत्काळ याची गंभीर दखल घ्यावी आणि संभाव्य गैरप्रकाराला आळा घालावा.
रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)