करा तयारी!पोलीस दलात १५ हजार पद भरतीस मंत्रिमंडळाची मंजूरी
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ हजार ५६० पोलिसांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी जून महिन्यात पोलीस महासंचालकांनी सुमारे १० हजार पोलिसांची भरती करण्याचे आणि १५ सप्टेंबरला मैदानी चाचणी होणार असल्याचे सांगितले होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पोलीस भरतीची (Police Recruitment) तयारी करणाऱ्या तरूणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील हजारो तरुणांच्या हाताला काम देण्याच्या हेतून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने (Cabinet decision) आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15 हजार पोलिसांची भरती (15 thousand police recruitment) करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ हजार ५६० पोलिसांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी जून महिन्यात पोलीस महासंचालकांनी सुमारे १० हजार पोलिसांची भरती करण्याचे आणि १५ सप्टेंबरला मैदानी चाचणी होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता प्रत्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत १५ हजार पदांना मंजूरी दिली आहे. त्यामुळे मागील काही महिन्यापासून पोलीस भरतीची वाट पाहाणाऱ्या तरूणांसाठी मोठी संधी चालून आली आहे.
अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली. मात्र, त्यानंतरही पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी समन्वय समितीने काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. सप्टेंबरपूर्वी शासन निर्णय, अर्ज भरणे, अर्ज छाननी आणि परीक्षा घेणे अशक्य आहे, अशी मागणी विद्यार्थी समन्वय समितीने मागच्याच आठवड्यात केली होती. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मैदानी चाचणीसाठी अडचणी निर्माण होत आहेत.