डिप्लोमाच्या प्रवेश नियमावलीत मोठा बदल..
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय), आणि वास्तुकला परिषद यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध संस्थांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी हा नियम लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे संस्थात्मक कोट्यातील व सर्व प्रवेश फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच पार पाडावी लागेल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, वास्तुकला आणि फार्मसी या अभ्यासक्रमांच्या (Diploma courses) डिप्लोमाच्या (पदविका) प्रवेश प्रक्रियेत (Diploma Admission Process) आता तीन एवजी चार प्रवेश फेरी (Four admission rounds instead of three) घेण्यात येणार आहे. त्यामुळे संस्थास्तरावर प्रवेशाच्या जागा रिक्त राहणार नाहीत. एक प्रवेश फेरी वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने (Department of Higher and Technical Education) डिप्लोमाच्या प्रवेश नियमावलीत सुधारणा (Amendments to Diploma Admission Rules) करण्याचा निर्णय घेतला आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय), आणि वास्तुकला परिषद यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध संस्थांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी हा नियम लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे संस्थात्मक कोट्यातील व सर्व प्रवेश फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच पार पाडावी लागेल. यात संस्थांना पात्र उमेदवारांची यादी, गुणवत्ता यादी, प्रवेश वेळापत्रक आदी गोष्टी संकेतस्थळावर प्रसिद्ध कराव्या लागणार आहेत.
प्रवेशाची संधी आणि शिष्यवृत्ती मिळणार
डिप्लोमाच्या तीन प्रवेश फेरीनंतर अनेक अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहत असे. त्यानंतर संस्थास्तरावर प्रवेश करण्यास अनुमती दिली जाते. संस्थास्तरावर प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही. त्या पार्श्वभूमीवर अजून एक प्रवेश फेरी घेण्याची मागणी पालकांकडून होत होती. अखेर विद्यार्थी हिताचा विचार करुन आणखी एक प्रवेश फेरी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीतून प्रवेशाची संधी मिळणार आहे. याद्वारे मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ प्राप्त होणार आहे.
प्रवेश कन्फर्म करणे अनिवार्य
विद्यार्थ्यांना आता पसंती क्रमानुसार महाविद्यालय मिळण्यासाठी आता चौथ्या फेरीपर्यंत प्रयत्न करता येणार आहे. पहिल्या फेरीत पसंती क्रमानुसार महाविद्यालय मिळाल्यास तेथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. आता नव्या निर्णयानुसार दुसऱ्या फेरीत पसंतीनुसार पहिल्या तीन क्रमांकात आणि तिसऱ्या फेरीत पसंतीनुसार पहिल्या सहा क्रमांत प्रवेश मिळाल्यास, तेथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत बाहेर पडेल आणि प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे.