PRN block: पीआरएन अनब्लॉकचा लाभ केवळ बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना; विद्या परिषदेचा निर्णय
बॅकलॉगच्या (अनुशेषामधील ) विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही संधी केवळ अंतिम वर्षातील अध्ययन अध्यापन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना लागू राहील.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC)नियमावलीनुसार पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे पीआरएन ब्लॉक (PRN block student)केलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai fule Pune University)विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय शनिवारी विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या (Academic Council) बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे पदवी प्राप्त करण्यापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजेच बॅकलॉगच्या (अनुशेषामधील ) विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही संधी केवळ अंतिम वर्षातील अध्ययन अध्यापन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना लागू राहील. शैक्षणिक वर्ष 2024- 25 साठी परीक्षेची ही संधी उपलब्ध राहणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सव वर्ष साजरे करत असून विद्यार्थी पदवी प्राप्त करण्यापासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठपुरावा केला होता. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे यांनी यासाठी यूजीसीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी घेतलेल्या निर्णयानुसार केवळ बॅक लॉगचे विषय राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून द्यावी, असे यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत शनिवारी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पीआरएन ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
डॉ.महेश काकडे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातील एकमेव असे विद्यापीठ आहे की ज्या विद्यापीठाने पीआरएन ब्लॉकमुळे परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना एकदा नव्हे तर दोनदा परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या अधिकार मंडळांने घेतलेल्या निर्णयानुसार अधिकाधिक विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्याचा परीक्षा विभागाचा प्रयत्न असेल. पीआरएन ब्लॉक झालेल्या आणि नियमानुसार परीक्षेस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे पीआरएन विद्यापीठाकडून अनब्लॉक केले जातील. तसेच जे विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र आहेत, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून परीक्षेसाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार करावा. महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती तपासून त्यातील पात्र विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाईल.
---------------
PRN संदर्भात विद्या परिषदेने (अकॅडमिक काउन्सिलने) घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनंदन. गेल्या वर्षी १ लाख २७ हजार, यावर्षी २४ हजार आणि आता ७ हजारपेक्षा अधिक PRN ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देवून विद्यापीठाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. देशात असा निर्णय घेणारं देशातलं दुसरं विद्यापीठ असून आजपर्यंतचा हा केवळ तिसरा निर्णय आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होईल,असे नियोजन आता परिक्षा विभाग करेल, अशी अपेक्षा आहे. यासाठी मदत करणाऱ्या राज्य केंद्रीय शिक्षण मंत्री, युजीसीचे ही आभार.
- सागर वैद्य, व्यवस्थापन परिषद सदस्य , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
--------------------------------------------------
विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत PRN संदर्भात चर्चा करून विॉद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी यासाठी युजीसीकडे केलेल्या पाठ्यपुराव्या बद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, व्यवस्थापन परिषद सदस्य , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
-------------------------
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मल्टिपल एन्ट्री आणि मल्टिपल एक्झिट हे तत्व लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. अशावेळी ठराविक विद्यार्थ्यांचे पीआरएन ब्लॉक हटवून, त्यांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी देतानाच विविध कारणांनी पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण अर्धवट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही संधी मिळायला पाहिजे, अशी मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे युवासेनेतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार आज विद्या परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रक काढून शेकडो विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याचा दिलासा दिला आहे. मात्र, कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे, याबाबत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण जाहीर करणे गरजेचे आहे. तेव्हाच विद्यार्थ्यांमधील गोंधळ दूर होइल.
- कल्पेश यादव, सहसचिव, युवासेना, महाराष्ट्र राज्य