उमेदवारांच्या मानसिकतेसोबत न खेळता तात्काळ पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करा; बच्चु कडू 

कृषीची पदे समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन, योग्य ती तारीख तात्काळ घोषित करून उमेदवारांना आश्वासित करावे. आर्थिक व अभ्यासाचे नियोजन करताना उमेदवारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून, उमेदवारांच्या मानसिकतेसोबत न खेळता तात्काळ पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करावी.

उमेदवारांच्या मानसिकतेसोबत न खेळता तात्काळ पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करा; बच्चु कडू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (State Services Pre Exam 2024) ही चार वेळा पुढे गेली आहे. त्यामुळे कृषीची पदे समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन, योग्य ती तारीख तात्काळ घोषित करून उमेदवारांना आश्वासित करावे. आर्थिक व अभ्यासाचे नियोजन करताना उमेदवारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून, उमेदवारांच्या मानसिकतेसोबत न खेळता तात्काळ पूर्व (Exam date should be announced) परीक्षेची तारीख जाहीर करावी. तसेच संयुक्त पूर्व परीक्षा गट 'ब' व गट 'क' ची जाहिरात देखील मागील आठ महिन्या पासून प्रसिद्ध झाली नसून उमेदवार चिंतेत आहे. त्यामुळे ही जाहिरात देखील लवकर प्रसिद्ध करावी, अशी मागणी आमदार बच्चु कडू (MLA Bachu Kadu) यांनी आपल्या 'एक्स' या सोशल मिडिया अकाउंटद्वारे आयोगाकडे केली आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २५ ऑगस्टला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द करून पंधरा दिवस उलटले तरी परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी आता आक्रमक झाले आहेत. तारखे अभावी विद्यार्थ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडल्याने काही उमेदवारांना आयोगाच्या अशा दिरंगाई विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला, तर सोमवारी 'टि्वटर' मोहीम राबवत आयोगाने तारीख जाहीर करावी अशी मागणी केली आहे. 

२२ ऑगस्टला परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षेचे नियोजन कोलमडले असून ते नैराश्यात गेले आहेत. सोमवारी 'टि्वटर' मोहिमेच्या माध्यमातून परीक्षेची तारीख जाहीर करण्यासाठी उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच काहींनी वारंवार परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याने आयोगाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.

डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होऊन नऊ महिन्यानंतरही आयोगाला परीक्षा घेणे शक्य झाले नाही. विविध कारणांमुळे तब्बल चार वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. राज्यसेवा परीक्षार्थींची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे. यातील बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत. हे विद्यार्थी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सोलापूर आदी शहरामध्ये राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. येथे राहणे, जेवण, अभ्यासिका व इतर खर्च मिळून सरासरी ८ ते १२ हजार रुपये प्रति महिना खर्च होतो. कित्येक विद्यार्थ्यांना हा खर्च पेलवत नाही. परीक्षेचे वेळापत्रक वरचेवर लांबत गेल्यामुळे याचा सर्वात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. तसेच वाढत्या वयानुसार उपजिविकेचे प्रश्न व लग्नाचा प्रश्न अनुत्तरीत राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड सामाजिक, कौटुंबिक व मानसिक दबावाला सामोरे जावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.