विद्यार्थ्यांच्या १५ तक्रारींचे होणार निवारण ; लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती  

श्रीकृष्ण पानसे प्रामुख्याने विद्यापीठाच्या संस्थात्मक तक्रार निवारण कक्षाच्या आणि विद्यापीठ तक्रार निवारण कक्षाच्या निर्णयाविरूद्धच्या अपिलींवर सुनावणी करून निर्णय देण्याचे काम करतील.

विद्यार्थ्यांच्या १५ तक्रारींचे होणार निवारण ; लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती  
ShriKrishna Panse

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठाच्या लोकपाल (Lokpal of Pune University) पदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.  सुरेश गोसावी (Vice Chancellor Dr. Suresh Gosavi) यांनी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे (ShriKrishna Panse) यांची नियुक्ती केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे देशातील सर्वच विद्यापीठांमध्ये ‘लोकपाल' नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या निर्देशांतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकृष्ण पानसे प्रामुख्याने विद्यापीठाच्या संस्थात्मक तक्रार निवारण कक्षाच्या आणि विद्यापीठ तक्रार निवारण कक्षाच्या निर्णयाविरूद्धच्या अपिलींवर सुनावणी करून निर्णय देण्याचे काम करतील. यामुळे आता विद्यार्थ्यांच्या तक्रारींच्या निवारणाला वेग मिळणार आहे.   

हेही वाचा : विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षेत गोंधळ ; प्रश्नपत्रिका बदलली

लोकपाल नियुक्त करण्यासाठी विद्यापीठातर्फे त्रीसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने लोकपाल पदासाठी तीन जणांचा अभ्यास करून माजी न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांच्या नावाची निवड केली. त्यानंतर त्यांच्या नावाची शिफारस व्यवस्थापन समितीच्या बैठकीत करण्यात आली होती. त्यांच्या या शिफारसीला समितीने मान्यता दिल्यानंतर कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी श्रीकृष्ण पानसे यांची लोकपाल पदी नियुक्ती केली. श्रीकृष्ण पानसे हे सातारा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून २००७ साली सेवानिवृत्त झाले. त्याआधी ते अमरावती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. तसेच केंद्र सरकारच्या औद्योगिक न्यायाधिकरण सह कामगार न्यायालयातही त्यांनी पीठसीन अधिकारी म्हणून काम केले आहे. ते सध्या विविध समित्यांवर तज्ञ म्हणून कार्यरत असून सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी संघ महाराष्ट्र याच्या अध्यक्ष पदी आहेत. विद्यापीठात त्यांची ही नियुक्ती तीन वर्षाकरीता करण्यात आली आहे. 

कोणत्या 15  प्रकारच्या तक्रारींचे होणार निवारण 

विद्यार्थ्यांशी भेदभावपूर्ण वर्तन (लिंग, वंश, जात, वर्ग, पंथ, जन्मस्थान, धर्म व दिव्यांगता आदींवरून), कोणत्याही कारणास्तव संस्थेकडे विद्यार्थ्यांनी जमा केलेली प्रमाणपत्रे परत न करणे, प्रवेशामध्ये आरक्षण नियमांचे पालन न करणे, निश्चित केलेल्या फी व्यतिरिक्त जास्त पैसे आकारणे, शिष्यवृत्त्या न देणे, शुल्क परताव्याचे नियम न पाळणे, शैक्षणिक वेळापत्रकामध्ये दिल्याप्रमाणे परीक्षा न घेणे तसेच निकाल उशिरा लावणे, अपारदर्शी वा चुकीचे मूल्यांकन करणे, माहिती पुस्तिकेमध्ये आश्वस्त केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सुविधा न देणे,  अशा 15 तक्रारींचा त्यात सामावेश असणार आहे.  
 ---------------

विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती समोर श्रीकृष्ण पानसे यांच्या नावाची शिफारस आली होती. समितीने यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर  कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. 

- डॉ. विजय खरे , प्रभारी कुलसचिव