बोर्डाकडून केंद्र संचालक, पर्यवेक्षक अदलाबदलीचा निर्णय मागे..  

दहावी - बारावी परीक्षा कॉपीमुक्त करण्याच्या उद्देशाने परीक्षा केंद्रातील केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक अदलाबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय रद्द करावा अन्यथा परीक्षा प्रक्रिया व पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघटना व शिक्षक आमदारांनी दिल्यानंतर प्रशासनाने नरमले असून या  निर्णयामध्ये बदल करण्यात आले आहेत.

बोर्डाकडून केंद्र संचालक, पर्यवेक्षक अदलाबदलीचा निर्णय मागे..  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) दहावी - बारावी परीक्षा (10th and 12th standard exams) कॉपीमुक्त करण्याच्या उद्देशाने परीक्षा केंद्रातील केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक अदलाबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय रद्द करावा अन्यथा परीक्षा प्रक्रिया व पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघटना व शिक्षक आमदारांनी दिल्यानंतर प्रशासनाने नरमले असून या  निर्णयामध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता २०१८ ते २०२४ या कालावधीत ज्या केंद्रांवर कॉपीची प्रकरणे आढळली, फक्त त्याच केंद्रांवरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. 

कोरोना काळातील २०२१-२२ या दोन परीक्षा वगळून मागील ५ वर्षाच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०१८, २०१९, २०२०, २०२३ व २०२४ या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत. अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशीसंबंधित व्यक्तींची नियुक्ती संबंधित केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/ उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्यात येणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे. 

कुठलीही पूर्वकल्पना न देता राज्य शिक्षण मंडळातर्फे पर्यवेक्षक अदलाबदलीचा निर्णय जाहीर केल्याच्या विरोधात शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत शिक्षण मंडळाच्या सर्व परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन मंडळाने निर्णयात अंशतः बदल केला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इयत्ता १० वी व १२ वी परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. 

तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्ह्यात दहावी-बारावी परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती, विभागीय मंडळे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकार्याने परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक कार्यरत राहील, अशी माहिती राज्य मंडळाने दिली आहे.