सेवा, साधना, सर्जनशीलता आणि संवेदनशीलतेवर विकसित भारत उभा करा : डॉ. रघुनाथ माशेलकर

राज्य विद्यापीठांसामोर अनेक आव्हाने आहेत. समाज व राष्ट्र उभारणीच्या कामात विद्यापीठांचे यापुढेही योगदान राहावे यासाठी विद्यापीठाला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे. रखडलेली प्राध्यापक भरती, कमी झालेला निधी अशा अनेक कारणांमुळे विद्यापीठ मागे पडत आहे.त्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी लक्ष घालावे,

सेवा, साधना, सर्जनशीलता आणि संवेदनशीलतेवर विकसित भारत उभा करा : डॉ. रघुनाथ माशेलकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सेवा, साधना, सर्जनशीलता आणि संवेदनशीलता या चार मूल्यांच्या पायावर विकसित भारत उभा राहिला पाहिजे. तसेच भारत विकसित होण्यासाठी आपण २०४७ पर्यंत का थांबायचे? त्या आधीच देश विकसित व्हायला हवा,यासाठी आवश्यक असलेली क्षमता देशातील युवकांमध्ये आहे. नव्या पिढीने पुढाकार घेऊन ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्याचप्रमाणे नवा भारत हा संतुलित, सुसंस्कृत, सुविधा असलेला, समृद्ध, स्वानंद असायला हवा,असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माशेलकर बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापुरकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ. धोंडीराम पवार, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, सागर वैद्य, बागेश्री मंठाळकर, प्रभारी कुलसचिव तथा वित्त व लेखा अधिकारी सीएमए डॉ. चारुशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांच्यासह विद्या परिषद ,अधिसभेचे सदस्य आणि अधिष्ठाता आदी उपस्थित होते.कार्यक्रमात  डॉ. माशेलकर यांच्या हस्ते सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल स्वर्गीय माननीय नामदार अजितदादा पवार (माजी उपमुख्यमंत्री), व्यापार व उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री डॉ. अशोक खाडे, सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल अप्पासाहेब दादाबा राजळे, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा. डॉ. पंडित विद्यासागर तसेच कला क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती शमा भाटे यांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

डॉ. माशेलकर यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले, अजितदादा पवार हे केवळ राजकारणी नव्हते, तर कर्तव्यनिष्ठ, प्रशासनावर भक्कम पकड आणि निर्भय निर्णयक्षमता यांचे चालते-बोलते उदाहरण होते. 

डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले, राज्य विद्यापीठांसामोर अनेक आव्हाने आहेत.समाज व राष्ट्र उभारणीच्या कामात विद्यापीठांचे यापुढेही योगदान राहावे यासाठी विद्यापीठाला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे. रखडलेली प्राध्यापक भरती, कमी झालेला निधी अशा अनेक कारणांमुळे विद्यापीठ मागे पडत आहे.त्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी लक्ष घालावे,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

डॉ. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठाचा प्रगती आलेख मांडताना सांगितले, विद्यापीठाने ७७ वर्षांत केवळ पदवीधर नव्हे तर समाजासाठी माणसे व संस्कृती घडविली आहे. शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधनातील नावीन्य व दूरदृष्टीच्या बळावर विद्यापीठाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळविले आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर आणि प्रभारी कुलसचिव तथा वित्त व लेखा अधिकारी सीएमए (डॉ.) चारुशीला गायके यांच्या हस्ते युवा गौरव पुरस्कार (२०२५ – २६) सुप्रसिध्द अभिनेत्री व महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर, कला (चित्रपट व नाट्य अभिनय), अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व पॅराऑलिंपीक रौप्य पदक विजेता सचिन खिलारी, क्रीडा, नाटककार, पटकथाकार, गीतकार व बालसाहित्य लेखक मुक्ता मिलिंद बाम, साहित्य, जपान सोसायटीची प्रमोशन ऑफ सायन्स या पोस्ट डॉक्टरल फेलोशिप प्राप्त व रॉयल केमिकल सोसायटी युके यांचे डाल्टन होरायझन पुरस्कार प्राप्त डॉ. संजोग नगरकर, सामाजिक कार्य आदींना प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट महाविद्यालय/परिसंस्था २०२५- २६  पुरस्कार, प्राचार्य / संचालक, उत्कृष्ट अध्यापक,उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार, उत्कृष्ट नाविन्यपूर्ण विशेष उपक्रम / संशोधन पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार (शहरी विभाग), उत्कृष्ट संचालक, शारीरिक शिक्षण व क्रिडा पुरस्कार आदी विविध पुरस्कार संस्था/व्यक्तींना विशिष्ट कामगिरीसाठी प्रदान करण्यात आले.