परभणी विद्यापीठातील २९ विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पीएच.डी. प्रदान 

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी विद्यापीठातील विविध विषयात पीएच.डी. पूर्ण केलेल्या 29 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

परभणी विद्यापीठातील २९ विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पीएच.डी. प्रदान 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा (Vasantrao Naik Marathwada Agricultural University)  दीक्षान्त समारंभ कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांच्या हस्ते सुवर्णजयंती दीक्षांत सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विद्यापीठातील विविध विषयात पीएच.डी. पूर्ण केलेल्या 29 जणांना पदवी प्रदान (29 students awarded PhD) करण्यात आली तर विविध शाखांचे 20 विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहेत. 

हरितक्रांतीचे जनक तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने दिमाखात परभणीत उभ्या असलेल्या मराठवाड्यातील कृषी विद्यापिठाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी संशोधनावर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल तथा वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती  सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

जागतिक तापमान वाढीमुळे निसर्गाच्या लहरीपणाने शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे वातावरणाशी जुळवून घेत येथील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होईल, अशा प्रकारच्या बि-बियाण्यांवर संशोधन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेचा विद्यापीठाने भाग बनावे. कृषि संशोधन आणि त्यातून साधल्या जाणाऱ्या विकासाला विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्राधान्य द्यावे, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने अनेक पिकांमध्ये संशोधन केले आहे, ही आनंदाची बाब असून कृषी उत्पादन वाढीत विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे.  विद्यापीठ करीत असलेले संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणेही  गरजेचे आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षणात बदल करताना कृषि हा विषय त्यामध्ये नव्याने समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिकांवर अधिक भर द्यावा, असे मत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.