प्रशिक्षणासाठी निघालेल्या तब्बल 25 शिक्षकांचा गंभीर अपघात
मुंबई व महामार्गावर रत्नागिरी नजीक बावनदी येथे सीएनजी गॅस घेऊन जाणारा टँकर आणि मिनीबस यांचा अपघात झाला. मिनी बस टँकरचा अपघात झाल्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि मिनी पास दरीत जाऊन कोसळली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (State Department of School Education) वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे शिक्षकांना बंधन घालण्यात आले. चिपळूणहून रत्नागिरीकडे प्रशिक्षणासाठी जात असलेल्या सुमारे 25 शिक्षकांच्या मिनी बसचा अपघात(Teacher's minibus accident) झाला.मात्र, शिक्षण संचालकांच्या या हेकेखोरीमुळे हा अपघात घडला असून त्यांची हकलपट्टी करावी,अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी वेळेत हजर न राहिल्यास त्यांना वगळण्यात येईल, असा फतवा शिक्षण विभागाने काढला. त्यामुळे शिक्षक मिनी बस करून प्रशिक्षणाला निघाले होते. परंतु, मुंबई व महामार्गावर रत्नागिरी नजीक बावनदी येथे सीएनजी गॅस घेऊन जाणारा टँकर आणि मिनीबस यांचा अपघात झाला. मिनी बस टँकरचा अपघात झाल्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि मिनी पास दरीत जाऊन कोसळली. त्यात अनेक शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. शिक्षकांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर म्हणाले, वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी रत्नागिरी येथे वेगाने जाणाऱ्या शिक्षकांच्या गाडीला झालेल्या अपघातामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. या अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे प्रशिक्षणस्थळी वेळेवर पोहोचण्यासाठी झालेली घाई. प्रशिक्षणा साठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे (SCERT) संचालक राहुल रेखावार यांनी दाखवलेली असंवेदनशीलता आणि कठोर धोरण शिक्षकांच्या मनात तीव्र संताप व्यक्त करणारे आहे आहे.
प्रशिक्षणासाठी काही मिनिटे उशीर झालेल्या शिक्षकांना प्रशिक्षणास अनुपस्थित म्हणून नोंदवले गेले. पहिल्याच दिवशी गावावरून, परराज्यातून धावपळ करत प्रशिक्षणासाठी पाच मिनिटे उशीर झालेल्या शिक्षकांना तुम्हाला प्रशिक्षण करता येणार नाही,असे सांगण्यात आले, व त्यांना घरी पाठवण्यात आले. प्रशिक्षणात वेळेवर उपस्थित राहूनही गर्दीमुळे वेळेत सही न करता आलेल्या शिक्षकांनाही प्रशिक्षणास मुकावे लागले. एका शिक्षकास प्रशिक्षणादरम्यान प्रकृती बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये जावे लागले. त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर राहण्याची विनंती केली, परंतु त्यालाही परवानगी नाकारण्यात आली. यामुळे शेकडो शिक्षकांना प्रशिक्षणास मुकावे लागले. ही बाब अत्यंत निंदनीय असून, शिक्षकांवर अविश्वास दाखवणारी आणि शिक्षण प्रक्रियेत लष्करी शिस्त आणणारी आहे. सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांनी वारंवार विनंती करूनही आपला हट्ट कायम ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला संवेदनशीलता असू नये ही खेदाची बाब आहे,असेही अभ्यंकर म्हणाले.
मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष नंदकूमार सागर म्हणाले, राज्य सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. प्रशिक्षण राबवण्याच्या पद्धतीमध्ये अनेकांचे आक्षेप आहेत. त्याचा विचार करून लवचिक धोरण अमलात यावयास हवे. ज्या शिक्षकांना प्रशिक्षणापासून वंचित ठेवले गेले त्यांना पुन्हा प्रशिक्षणात सामील करून घ्यावे. शिक्षण खात्यात शिक्षणावर, शिक्षकांवर व विद्यार्थ्यांवर विश्वास असणारे, संवेदनशील अधिकारी कार्यरत असावेत. प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शिक्षकांच्या अपघाताची जबाबदारी scert चे संचालक राहूल रेखावार यांच्यावर निश्चित करावी. तसेच यापुढील काळात शिक्षकांना प्रशिक्षणासाठी वेठीस धरू नये.