राज्यात नालंदासारखी विद्यापीठे तयार व्हावीत ; राज्यपाल हरिभाऊ बागडे
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठामध्ये असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या (एआययू) माध्यमातून पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचे हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतीय विद्यापीठे जगाच्या नकाशावर पोहोचली पाहिजेत. अन्य देशांतून विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी आले पाहिजेत. त्यासाठी राज्यातील प्रत्येक कुलगुरूंनी आपले विद्यापीठ सर्वोत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक राज्यात नालंदासारखी विद्यापीठे तयार होणे गरजेचे असल्याचे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (Rajasthan Governor Haribhau Bagde) यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठामध्ये असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या (एआययू) माध्यमातून पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचे हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी एआययूचे सचिव पंकज मित्तल, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
युवाशक्ती व ज्ञानाच्या बळावर विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे आहे. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देऊन उपयोग नाही. जीवन जगण्यासाठीची कोशल्य शिकविता आली पाहिजेत. शिक्षणामुळे आदर्श नागरिक घडले पाहिजेत. देशातील कुलगुरू येथे आले आहेत. सर्व कुलगुरूंनी आपले विद्यापीठ सर्वोत्तम होईल याकडे लक्ष द्यावे. विद्यापीठांना जागतिक दर्जा प्राप्त व्हावा. विदेशी मुले भारतात शिक्षणासाठी आली पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष टी. जी. सीताराम यांनी देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. देशामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी जगभर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत असून, देशातील विद्यापीठांमध्ये आधुनिक शिक्षणाला प्राधान्य मिळू लागल्याचे सांगितले. एआययूचे अध्यक्ष विनय कुमार पाठक यांनीही शिक्षणासोबत संस्काराची गरज आहे. विद्यापीठांमधील लालफीतशाही कामकाज कमी झाले पाहिजे. निर्णय वेगाने झाले पाहिजेत. काळानुसार आधुनिकीकरण महत्त्वाचे असल्यामुळेच परिषदेमध्ये नवीन संकल्पनांवर आधारित विषयांना प्राधान्य दिले असल्याचे सांगितले, हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.