कुपोषणाचे प्रमाण कमी होणार? अंगणवाडीत बालकांच्या आवडीचा खाऊ दिला जाणार; मंत्री तटकरे
मुंबईसारख्या महानगरांमध्ये आयसीडीएस आणि महापालिकेच्या बालवाड्या यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी नगर विकास विभागासोबत विशेष बैठकीची विनंती केली आहे. जेणेकरून झोपडपट्टी भागातील एकही बालक पोषणापासून वंचित राहणार नाही. टीएचआर पाकिटांच्या गुणवत्तेबाबत प्रयोगशाळेत तपासणी केली जात आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील अंगणवाडीमध्ये बालकांना (Anganwadi child) त्यांच्या पसंतीचा आहार दिला जाणार असल्याचे येत्या काळात कुपोषणाचे प्रमाण (Malnutrition rate) कमी करण्यावर राज्य सरकार भर देत आहे. अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची गुणवत्ता (Nutritional quality) व चव सुधारण्यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असून, राज्यातील कुपोषणाचे प्रमाण आणखी कमी करण्यावर शासनाचे विशेष लक्ष असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) यांनी विधान परिषदेत दिली. राज्यात कुपोषण कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असून, ११ जिल्ह्यांमध्ये पायलट प्रकल्प सुरू केला असे त्या म्हणाल्या.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज महिला व बालविकास विभागाशी संबंधित विविध मुद्द्यांवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली. राज्यामध्ये गेल्या तीन वर्षांत कुपोषणाचे प्रमाण सुदैवाने कमी होत असल्याचे चित्र असून, हे प्रमाण ०.१० टक्क्यांच्याही खाली आणण्यासाठी आमचा विभाग अत्यंत गांभीर्याने प्रयत्न करत आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये 'पायलट प्रोजेक्ट' राबवण्यात येत आहे. १०० आणि १५० दिवसांच्या उपक्रमांचे सातत्य राखून कुपोषणाचे प्रमाण अधिकाधिक कमी करण्यावर आमचा भर असून, शहरी भागातील कुपोषण आणि बालकांमधील लठ्ठपणा रोखण्यासाठी आम्ही 'गॅप मॅपिंग'च्या माध्यमातून विशेष सर्व्हे पूर्ण केला आहे, असे तटकरे म्हणाल्या.
मुंबईसारख्या महानगरांमध्ये आयसीडीएस आणि महापालिकेच्या बालवाड्या यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी नगर विकास विभागासोबत विशेष बैठकीची विनंती केली आहे. जेणेकरून झोपडपट्टी भागातील एकही बालक पोषणापासून वंचित राहणार नाही. टीएचआर पाकिटांच्या गुणवत्तेबाबत प्रयोगशाळेत तपासणी केली जात आहे. परंतु ही पाकिटे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा कालावधी कमी करून ही संपूर्ण यंत्रणा अधिक गतिमान आणि सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच, ज्या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही, तिथे शासकीय शाळांच्या उपलब्ध वर्गखोल्या मिळवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाशी समन्वय साधला जात आहे. शहरी कुपोषण निवारण आणि ग्रामीण भागातील प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून महाराष्ट्र कुपोषणमुक्त करण्यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे, असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात व्यक्त केला.