घसरलेल्या NIRF रँकिंगचा विद्यापीठाला विसर; राज्यपालांच्या आदेशानंतरही प्रशासन हालेना 

आयएनआयआरएफ रँकिंगमध्ये पहिल्या दहा विद्यापीठांच्या यादीत असणारे पुणे विद्यापीठ आता शंभर विद्यापीठांच्या शेवटून दहा विद्यापीठांच्या यादीत आले आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असून त्याचा परिणाम विद्यापीठाच्या एकूण वाटचालीवर होणार आहे.

घसरलेल्या NIRF रँकिंगचा विद्यापीठाला विसर; राज्यपालांच्या आदेशानंतरही प्रशासन हालेना 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या एनआयआरएफ (NIRF) रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University)रँकिंग 91 क्रमांकापर्यंत खाली घसरले. त्यावर विद्यापीठाच्या अधिकार मंडळामध्ये गांभीर्याने चर्चा करण्यात आली. एवढेच नाही तर नवनियुक्त राज्यपाल यांनी सुद्धा रँकिंग वाढीसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिल्या.मात्र, त्यानंतरही विद्यापीठ प्रशासन रँकिंग वाढीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. याच पद्धतीने विद्यापीठाचे कामकाज सुरू राहिले तर पहिल्या शंभर विद्यापीठांच्या यादीमधूनही पुणे विद्यापीठ बाहेर जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दबदबा केवळ भारतातच नाही तर परदेशातही होता.मात्र घसरत चाललेल्या रँकिंगमुळे तो दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आयएनआयआरएफ रँकिंगमध्ये पहिल्या दहा विद्यापीठांच्या यादीत असणारे पुणे विद्यापीठ आता शंभर विद्यापीठांच्या शेवटून दहा विद्यापीठांच्या यादीत आले आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असून त्याचा परिणाम विद्यापीठाच्या एकूण वाटचालीवर होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या रँकिंग वाढीच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करणे अपेक्षित आहे. परंतु,अजूनही विद्यापीठाने या दृष्टीने आवश्यक पावले उचलत ठोस उपाययोजना केली नसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

विद्यापीठ अधिकारी,कर्मचारी करणार उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन

 विद्यापीठांचे कुलपती व महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नोव्हेंबर महिन्यात राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन विद्यापीठांच्या गुणांकन वाढीसाठी टास्क फोर्स स्थापन करावे,असे आदेश दिले होते. विद्यापीठांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुणांकन पातळी सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यापीठाची थेट जोडलेली,अशी टास्क फोर्स स्थापन करून दर पंधरवड्याला त्याबाबतचा प्रगती अहवाल सादर केला जाईल, अशी प्रणाली निर्माण करावी, अशा स्पष्ट सूचना राज्यपाल देवव्रत यांनी दिल्या होत्या. परंतु, या आदेशास एक महिना उलटून गेला तरीही अद्याप याबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे दिसून येत आहे. 

विद्यापीठात प्राध्यापकांची संख्या अपुरी असल्यामुळे विद्यापीठाचे रँकिंग घसरले असल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आला होता. परंतु, अजूनही विद्यापीठ प्राध्यापक भरती संदर्भातील तिढा सुटलेला नाही. विद्यापीठाकडून प्राध्यापक भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यास वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. त्यातच प्राध्यापक भरती संदर्भातील निकषावर शिक्षण क्षेत्रात वाद सुरू आहे. त्यामुळे शिक्षणाचे, विद्यापीठांच्या गुणवत्तेचे कोणाला काही घेणे देणे आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.