आरटीई प्रवेशासाठीचा शेवटचा दिवस; अजूनही ४० हजारांहून अधिक जागा रिक्त
दहा दिवसांचा अतिरिक्त कालावधी देऊनही 40 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अजूनही प्रवेश घेतला नसल्याचे समोर आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (RTE Admission Process) राबवली जाते. या प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थ्यांची (Students) निवड झाली असून या विद्यार्थ्यांना आज 10 मार्चपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी अंतिम मुदत (Deadline for confirming admission) देण्यात आली होती. मात्र, यापैकी केवळ 61 हजार 474 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. यावरून मुदतवाढ देऊनही अनेक पालकांनी आरटीई प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसून येत आहे.
अर्ज प्रकीया सुरु झाल्यानंतर आरटीई प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, पडताळणीचे काम शिल्लक असल्याने राज्यस्तरावरून प्रवेश निश्चित करण्यासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दहा दिवसांचा अतिरिक्त कालावधी देऊनही 40 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अजूनही प्रवेश घेतला नसल्याचे समोर आले आहे.
निवड झालेल्या बालकांना प्रवेशासाठी आज शेवटचा एकच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे पालक प्रवेश निश्चितीसाठी पुढाकार घेणार का? असा सवाल उपस्थित होतोय. प्रवेशासाठी जास्त प्रमाणात विद्यार्थी संख्या राहीली तर निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखीन संधी मिळणार का की, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळणार हे देखील पाहण महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान,10 मार्चपर्यंत आरटीओच्या सोडतीत निवड झालेल्या बालकांना प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. या मुदतीत ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणार नाहीत त्यांच्या जागेवर प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमानुसार विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.
