जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे अभिनेत्याचे प्रमुख काम
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आपल्या देशाला उत्तम सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.परंतु, आजही त्याची ओळख आपल्या सर्वाना झालेली नाही.आपण पाश्चिमात्यांचे कौतुक करतो, कायम त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतो.मात्र, भारताबाहेर किती लोक आपले चित्रपट पाहतात ? आपले खाद्यपदार्थ खातात ? आपली पारंपरिक वेशभूषा करतात ? ही पाहणे एक अभिनेता म्हणून माझे प्रमुख काम असून जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे माझी जबाबदारी आहे, असे बॉलिवूड अभिनेता, अविनाश तिवारी, यांनी सांगितले.
सिंबायोसिस स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्स अँड फोटोग्राफी (SSVAP) च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांतर्फे ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान सिंबायोसिस, लवळे कॅम्पस येथे "सृजन" या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभासाठी अभिनेता अविनाश तिवारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, अविनाश म्हणाले, भावी पिढीच्या कलाकाराने नाही म्हणायला शिकले पाहिजे आणि त्यावर ठाम राहता आले पाहिजे.चित्रपट हे केवळ कथा सांगण्यापुरते ,मर्यादित नसून त्याद्वारे समाजासाठी महत्वपूर्ण संदेश देखील दिले जातात. मुख्य प्रवाहातील चित्रपट जीवनातील विस्तृत वळणांबद्दल बोलतात. ओटीटीची पोहोच ही जगात आज २०० देशांपर्यंत आहे.
डॉ. रुची खेर जग्गी, अधिष्ठाता, फॅकल्टी ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ व पुनीत गुप्ता, प्रमुख, सिंबायोसिस स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्स अँड फोटोग्राफी आदी इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सिकंदर का मुकद्दर, लैला मजनू व मडगाव एक्सप्रेस सारख्या चित्रपटांमधून अविनाश तिवारी यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे.