नवी संचमान्यता शिक्षकांच्या मुळावर, शिक्षक संघटना आक्रमक 

संच मान्यतेमुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. नवीन संच मान्यता शिक्षकांच्या मुळावर उटली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिक्षक संघटना आक्रमक झाल्याचे समोर आले आहे. 

नवी संचमान्यता शिक्षकांच्या मुळावर, शिक्षक संघटना आक्रमक 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी (Academic year 2024-25) शाळांची नवीन संच मान्यता (New Education Policy Update) जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या संच मान्यतेमुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये नाराजीचा (State Teachers' Association) सूर उमटत आहे. ही नवीन संच मान्यता शिक्षकांच्या मुळावर उटली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिक्षक संघटना आक्रमक झाल्याचे समोर आले आहे. 

नव्या संच मान्यतेनुसार इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत एकूण २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळेवर शून्य शिक्षकांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतचे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असल्याचा भीती निर्माण झाली आहे. नव्या धोरणामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असून, शेकडो शाळांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.  

यापूर्वी देखील ६१ पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर तीन शिक्षकांऐवजी २ शिक्षकांना मान्यता देण्यात आली. राज्यातील सामाजिकशास्त्र, विज्ञान व भाषा विषयातील हजारो शिक्षकांची पदे नव्या संच मान्यतेमुळे कमी होणार आहेत. या व्यतिरिक्त अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. 

मागील शासन निर्णयानुसार इयत्ता सहावी ते आठवीतील मुलांची संख्या ३६ असेल तर तीन शिक्षकांना मान्यता देण्यात आली होती. मात्र, नवीन संच मान्यतेनुसार विचार केला तर इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या ३६ विद्यार्थ्यांसाठी दोनच शिक्षक मंजूर होतील. त्यामुळे शिक्षकांचा कामाचा ताण वाढेल, शिवाय त्या-त्या विषयातील शिक्षक देखील मिळणार नाहीत. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 
_________________________________________

राज्यभरातील प्रत्येक शाळेची गणना समान करता येणार नाही. आदिवासी पाडे, डोंगराळ भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी असते. त्यामुळे सरकारने त्या गोष्टीचा बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. नवी संच मान्यता मान्य नसून ती पूर्वीप्रमाणे लागू करावी. या संच मान्यतेमुळे राज्यतील हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. 

महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष राज्य मुख्याध्यापक महामंडळ